नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यावर आला आहे. सद्य:स्थितीमध्ये दक्षिणेसह उत्तरेकडील राज्यांमधून प्रतिदिन सरासरी १०० टन आंब्याची आवक होत आहे.
आंब्याचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्यामुळे ग्राहकांचा आंबा खरेदीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यंदा आंबा हंगाम उशिरा सुरू झाला होता.
ग्राहकांची प्रथम पसंती असलेल्या कोकणातील हापूसचा हंगाम उशिरा सुरू होऊन लवकर संपला. यामुळे ग्राहकांची निराशा झाली होती. परंतु ही कसर इतर आंब्यांनी भरून काढली आहे.
यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ग्राहकांना आंबा उपलब्ध होणार आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश व केरळ परिसरातून निलम, मल्लिका, तोतापुरी व मलगोवा आंब्याची आवक होत आहे.
उत्तर प्रदेशमधून दशेरी, लंगडा व चौसा या आंब्याची आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये आंबा २० ते ८० रुपये किलो दराने विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये ३० ते २०० रुपये किलो दराने आंब्याची विक्री होत आहे.
पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या आंब्याची चवही गोड असून, दरही नियंत्रणात असल्यामुळे ग्राहकांकडून आंबा खरेदीला प्रतिसाद मिळत आहे.
आंब्याचे होलसेल व किरकोळ मार्केटमधील प्रतिकिलो दर
प्रकार - होलसेल - किरकोळ
नीलम - ५० ते ६० - ८० ते १२०
मल्लिका - ८० - १०० ते १५०
तोतापुरी - २० ते २५ - ३० ते ८०
मलगोवा - ६० ते ७० - १०० ते २००
दशेरी - ३० ते ३५ - ८०
लंगडा - ३० ते ४० - ७० ते १००
चौसा - ७० ते ८० - १५० ते १८०
आंबा हंगाम शेवटच्या टप्यात आहे. सद्यःस्थितीमध्ये दक्षिण भारत व उत्तरेकडील राज्यांमधून आवक होत आहे. सात प्रकारचे आंबे मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असून, या वर्षी ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत ग्राहकांना आंबा उपलब्ध होईल. - संजय पानसरे, संचालक फळ मार्केट
अधिक वाचा: Phul Market Pune : गुरुपौर्णिमेमुळे फुलांच्या बाजारात तेजी; कोणत्या फुलाला कसा भाव?