सांगली जिल्ह्यातील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
१ नोव्हेंबर २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यातून तब्बल ४७२ कंटेनरमधून सहा हजार ३.१५ टन द्राक्षांची निर्यात जगातील २० देशांमध्ये झाली आहे.
द्राक्ष निर्यातीतून जिल्ह्याला आतापर्यंत ६० कोटींवर परकीय चलन मिळाले असून अजूनही निर्यात चालूच आहे. यूएई आणि नेदरलँड्स देशात सर्वाधिक द्राक्षांची निर्यात झाली आहे.
जिल्ह्यातील तासगाव, खानापूर मिरज, जत, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूस तालुक्यांमधून सर्वाधिक द्राक्ष निर्यात होत आहे.
२०२५-२६ या वर्षात जिल्ह्यातून नेदरलँड्स (हॉलंड) हा देश निर्यातीमध्ये सर्वाधिक आघाडीवर असून, तेथे दोन हजार ६१९.६७ टन द्राक्ष पाठविण्यात आली आहेत.
त्यानंतर संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे ९४४.४८ टन, तर युनायटेड किंगडममध्ये ८३७.८६ टन द्राक्षांची निर्यात झाली. रशियन फेडरेशनमध्ये ४८१.८२ टन आणि डेन्मार्कमध्ये १५४.७६ टन द्राक्षे पाठविण्यात आली आहेत.
याशिवाय ओमान, कतार, रोमानिया, थायलंड, मलेशिया, नॉर्वे, आयर्लंड, स्पेन, कॅनडा, स्वीडन, तैवान, कुवैत आणि हाँगकाँग या देशांमध्येही सांगलीच्या द्राक्षांची निर्यात झाली आहे.
त्यामुळे यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील द्राक्षांना जागतिक बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. द्राक्ष निर्यातदारांच्या माहितीनुसार प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
द्राक्षाला प्रतिकिलो १२० ते १७० रुपयांपर्यंत दर
युरोप आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सांगली जिल्ह्यातील द्राक्षांना मागणी आहे. युरोपला चांगल्या दर्जाच्या द्राक्षांना प्रतिकिलो १२० ते १७० रुपये दर मिळाला आहे.
या देशांत अशी झाली द्राक्ष निर्यात
| देश | कंटेनर | निर्यात (मेट्रिक टन) |
|---|---|---|
| हाँगकाँग | १ | २.१० |
| स्वीडन | १ | १२.४८ |
| तैवान | १ | १३.०० |
| कुवैत | २ | १४.७८ |
| कॅनडा | १ | १७.७१ |
| चीन | १४ | २५.४६ |
| स्पेन | ५ | ३९.०० |
| थायलंड | २० | ५३.७० |
| रोमानिया | ४ | ५४.८२ |
| कतार | ४ | ५७.५३ |
| नॉर्वे | १० | ६५.०० |
| आयर्लंड | ५ | ६६.३० |
| ओमान | १० | १५०.८१ |
| डेन्मार्क | ३ | १५४.७६ |
| मलेशिया | २६ | २०२.०० |
| सौदी अरेबिया | २८ | ३६५.८७ |
| रशियन फेडरेशन | ३४ | ४८१.८२ |
| युनायटेड किंगडम | ६६ | ८३७.८६ |
| संयुक्त अरब अमिरात | ६५ | ९४४.४८ |
| नेदरलँड्स | २०२ | २६१९.६७ |
सध्या द्राक्ष हंगाम तेजीत सुरू असून निर्यात प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये सध्या 'फील गुड'चे वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिल महिन्यातील छाटणीवेळी झालेल्या पावसामुळे व अपुरा सूर्यप्रकाश यामुळे काडी परिपक्व झाली नसल्याने द्राक्ष घडनिर्मिती झाली नाही त्यामुळे द्राक्ष उत्पादनात कमालीची घट झाली आहे परंतु उत्पादन घटल्याने द्राक्ष दरात वाढ झाली आहे. - दत्ताजीराव पाटील, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ, सांगली
अधिक वाचा: लाल मिरचीच्या दरात दुपटीने वाढ, मसालेही खाता आहेत भाव; वाचा किलोला किती रुपये दर?
