रामकिशन भंडारे
लातूर जिल्ह्यात यंदा सोयाबीन खरेदीसाठी प्रशासनाने मोठी यंत्रणा राबवली असली, तरी सध्या खुल्या बाजारपेठेतील दर हमीभावापेक्षा सरस ठरत आहेत. केंद्र सरकारचा हमीभाव ५३२८ रुपये असताना, लातूर बाजार समितीत सोयाबीनचे दर सहा हजारांवर गेले आहेत. यामुळे सुरुवातीला गजबजलेली हमीभाव खरेदी केंद्रे आता ओस पडली असून, शेतकऱ्यांचा ओढा खुल्या बाजारपेठेकडे वाढला आहे.
जिल्ह्यातील एकूण १३० हमीभाव खरेदी केंद्रांवरून १२ लाख ६७ हजार क्विंटलहून अधिक सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने मंजुरी दिलेल्या ७ बाजार समित्यांसह १०५ शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून सोयाबीनची खरेदी सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाची (फेडरेशन) २५ केंद्रांकडून खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे.
सध्या खुल्या बाजारात सोयाबीन व तुरीचे दर हमीभावापेक्षा ५०० ते १००० रुपयांपेक्षा अधिक असल्याने हमीभाव खरेदी केंद्रांवर सध्या शुकशुकाट आहे. खरेदी केंद्रांवर सुरुवातीला बारादाणा टंचाई व इतर तांत्रिक अडचणींमुळे खरेदी उशिराने सुरू झाली. १५ फेब्रुवारीपर्यंत खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे.
९४ हजार शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी
पणन मंडळाने सर्वाधिक १०५ केंद्रांद्वारे ९,६६,२२४ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. 'पणन'कडे नोंदणी केलेल्या ५८,१९९ शेतकऱ्यांपैकी १५ हजार ५५९ तर 'फेडरेशन'च्या २५ केंद्रांवर नोंदणी केलेल्या ३५,८३७ शेतकऱ्यांपैकी २१ हजार ९१७ शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात एकूण ९४,०३६ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे.
तूर खरेदीच्या नोंदणीलाही अनास्था...
खरेदी केंद्रावर माल विकल्यानंतर चुकारे मिळण्यास काही दिवसांचा अवधी लागतो. त्याउलट, कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकल्यानंतर तत्काळ रोख रक्कम उपलब्ध होत आहे. सध्या सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा क्विंटलमागे ६०० ते १,००० रुपयांनी अधिक असल्याने उर्वरित शेतकरी आपला माल व्यापाऱ्यांनाच विकण्याला पसंती देत आहेत. सध्या हमीभावाने तूर खरेदीची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. मात्र, सध्या तुरीचे दरही हमीभावापेक्षा अधिक असल्याने तुरीच्या नोंदणीसही शेतकऱ्यांची अनास्था असल्याचे दिसून येत आहे.
