Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचे घर भरण्यापेक्षा यंदा काळ्या आईचे पोट भरू; मंदावलेल्या बाजारापुढे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:51 IST

केळी व्यापाऱ्यांकडून केवळ २ ते ३ रुपये किलो दराने केळी खरेदी करण्याच्या ऑफर येत असल्याने, उत्पादन खर्चही निघत नसल्याने हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती शेतकरी किशोर कारंडे यांनी दिली.

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील होळ येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने केळीच्या दरातील मोठ्या घसरणीला कंटाळून तब्बल एक एकराचे उभे पीक नांगरून शेतात गाडण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यापाऱ्यांकडून केवळ २ ते ३ रुपये किलो दराने केळी खरेदी करण्याच्या ऑफर येत असल्याने, उत्पादन खर्चही निघत नसल्याने हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती शेतकरी किशोर कारंडे यांनी दिली.

कारंडे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात केळीची लागवड करताना रोपे, खते, औषधे आणि मजुरीसाठी सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च केले होते.

सुरुवातीला निर्यातबंदीमुळे बाजारभाव दबावात होता. मात्र, नंतर परिस्थिती सुधारत २५ ते ३० रुपये किलोपर्यंत दर पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव विशेषतः अमेरिका, इराण आणि हसायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती याचा थेट परिणाम शेतीमालाच्या निर्यातीवर झाला, निर्यातीत अडथळे निर्माण झाल्याने केळीचे दर घसरत गेले.

२०-२२ रुपये किलोवर असलेले दर अचानक १०-१२ रुपयांवर आले आणि शेवटी व्यापाऱ्यांनी केवळ २-३ रुपये किलो दराने खरेदीची मागणी केली.

या परिस्थितीत उत्पादन खर्च तर दूरच, किमान मजुरीही मिळणे कठीण झाले. त्यामुळे "व्यापाऱ्यांची चांदी करण्यापेक्षा पीक शेतात गाडून जमिनीला खत करणेच योग्य," अशी संतप्त प्रतिक्रिया कारंडे यांनी व्यक्त केली.

बारामती परिसर प्रामुख्याने ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, उसालाही अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी केळी लागवडीकडे वळले होते. आता केळीच्या दरातील अनिश्चिततेमुळे त्यांनाही मोठा फटका बसत आहे.

बाजारभावातील सततच्या चढ-उतारामुळे परिसरातील केळी उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत, हवामान बदल, अवकाळी आणि रोगराई यामुळे उत्पादनावरही परिणाम होत आहे.

खर्च वाढ, उत्पन्न घटते◼️ व्यापाऱ्यांकडून दर ठरविताना पारदर्शकता नसल्याची तक्रारही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.◼️ बाजार समित्यांमध्ये योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते.◼️ परिणामी, दर पाहून खरेदी करण्याचे प्रकार बाढल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.◼️ हवामान बदल, अवकाळी आणि रोगराई यामुळे उत्पादनावरही परिणाम होत आहे.◼️ यामुळे खर्च वाढतो, मात्र उत्पन्न घटते, अशी दुहेरी कात्री शेतकऱ्यांना बसत आहे. कर्जबाजारीपणातही वाढ होत आहे.

सुरुवातीला दर चांगले होते, पण युद्ध सुरू झाल्यानंतर भाव थेट १०-१२ रुपयांवर आले. शेवटी व्यापारी २-३ रुपये किलो दर देऊ लागले. अशा दरात विकण्यापेक्षा पीक शेतात गाडलेलेच बरे, त्यामुळे जमिनीला तरी खत मिळेल. - किशोर कारंडे, केळी उत्पादक शेतकरी, होळ

अधिक वाचा: पुणे-बंगळुरू ग्रीनफिल्डसाठी २० हजार एकरचे भूसंपादन; महामार्गात कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश?

English
हिंदी सारांश
Web Title : Banana farmers prefer enriching soil over selling at low prices.

Web Summary : Distressed by low banana prices (₹2-3/kg), a Baramati farmer destroyed his crop. Production costs weren't covered due to export hurdles from global tensions. Farmers face rising costs, market instability, and weather impacts, deepening debt.
टॅग्स :केळीशेतीशेतकरीपीकबाजारमार्केट यार्डफलोत्पादनफळेबारामतीयुद्धखतेपीक व्यवस्थापन