सोलापूर : सर्वाधिक विमा हप्ता भरलेल्या बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना विमा कंपनीने पीक नुकसानभरपाई देताना ठेंगा दाखवला आहे.
सर्वात कमी रक्कम भरलेल्या मंगळवेढा व माढा तालुक्यांतील शेतकऱ्यांना धनलाभ झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर झालेल्या ४१ कोटी ४५ लाख रुपयांपैकी २५ कोटी रक्कम या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांना मिळाली आहे.
मागील खरीप हंगामाची जिल्ह्यात आतापर्यंत मूग, बाजरी, तूर, कांदा व सोयाबीन या पिकांची नुकसानभरपाई विमा कंपनीने मंजूर केली आहे.
ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचे पीक विमा कंपनीकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रमुख सोयाबीन पिकाला यंदा पीक विमा कंपनीने डावलल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
मागील खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. मुसळधार पावसाने सोयाबीन हाती लागले नव्हते.
मात्र, पीक विमा कंपनीनेही सोयाबीनची नुकसानभरपाई मंजूर केली नाही. मागील वर्षी विमा हप्त्याची १५३ कोटी १९ लाख रुपये इतकी रक्कम विमा कंपनीला जमा झाली होती.
त्यामध्ये मंगळवेढा तालुक्याची विमा हप्त्याची रक्कम १ कोटी २४ लाख तर माढा तालुक्याची एक कोटी ५९ लाख रुपये विमा कंपनीकडे जमा झाली होती.
पीक विमा कंपनीकडून मंगळवेढ्याला ११ हजार ४३३ शेतकऱ्यांना १७ कोटी ९९ लाख रुपये तर माढा तालुक्यातील १४ हजार शेतकऱ्यांना ७ कोटी ६ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
कांद्याला मिळाले ३० कोटी
◼️ यंदा पीक विमा कंपनीकडून कांद्याला सर्वाधिक नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.
◼️ जिल्ह्यासाठी ४२ हजार ७९७ शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या ४१ कोटी ४६ लाख रुपयांपैकी कांद्यासाठी २० हजार ५६९ शेतकऱ्यांना २९ कोटी ६६ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
◼️ मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माळशिरस व माढा तालुक्यांना कांद्याची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.
अधिक वाचा: येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्जाचे नवे दर जाहीर; आता उसाला हेक्टरी किती कर्ज मिळणार?
