जालना जिल्ह्याचा हस्तपोखरी (ता. अंबड) परिसर 'कांदा बीजोत्पादनाचे आगार' म्हणून ओळखला जातो. यंदा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आणि सध्या पाणी मुबलक असल्याने, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांदा बीजोत्पादनाकडे कल दाखविला.
मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून हवामान बदलत असल्याने त्याचा फटका बसत आहे. कांदा बीजोत्पादनासाठी विविध कंपन्यांकडून मालाच्या प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत भाव निश्चित करून करार केले जातात.
या खात्रीशीर उत्पन्नाच्या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली. सुरुवातीला पिकाची उगवण क्षमता चांगली असल्याने समाधान व्यक्त होत होते. परंतु आता पीक ऐन गोंडा फुटण्याच्या (फुलोऱ्याच्या) अवस्थेत असतानाच निसर्गाची वक्रदृष्टी पडल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकऱ्यांवर खर्चाचा बोजा
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. कधी ढगाळ वातावरण, तर कधी दाट धुके, थंडी आणि अचानक वाढणारी उष्णता यामुळे पिकावर बुरशीजन्य रोग आणि 'मावा' रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.
मदतीची अपेक्षा
खरीप गेल्यानंतर रब्बी हंगामात निसर्गाची साथ नसल्याने बीजोत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत आले असून, शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे.
माझ्याकडे पाच एकर क्षेत्रावर कांदा बीजोत्पादनाचे पीक आहे. परंतु, रोगांनी पिकाला घेरले आहे. फवारण्यांचा खर्च आवाक्याबाहेर जात असून, हाताशी आलेला रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. - दत्ता गाढे, शेतकरी.
