लाखेवाडी : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या चालू असलेल्या २५ व्या ऊस गळीत हंगामामध्ये एका दिवशी कारखान्याच्या इतिहासात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
मंगळवारी (दि. २) एकाच दिवशी ६४०० मे. टन उसाचे गाळप करून कारखान्याने हा नवा विक्रम साध्य केला आहे.
चालू गळीत हंगामामध्ये सुमारे ७ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी कारखान्याची नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे, असे कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी माहिती दिली.
कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे सुरू असून, मंगळवार अखेर १,८९,५८२ मे. टन उसाचे गाळप करण्यात आले आहे, ज्यातून १,४०,३६० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.
आजचा साखर उतारा १०.६० टक्के असून, सध्या सरासरी साखर उतारा ९.९५ टक्के आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ३५०० मे. टन असली तरी, सध्या ५६०० ते ५९०० मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे, असे सांगितले.
कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आज अखेर ७०,१०,४११ युनिट वीज एक्सपोर्ट करण्यात आली आहे. तसेच, इथेनॉलचे आज अखेर १६,४०,११० लिटर उत्पादन झाले आहे.
याशिवाय, कारखान्याचे बायोगॅस, सेंद्रिय खत यांसारखे उपपदार्थ निर्माण प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत, असे भाग्यश्री पाटील यांनी नमूद केले.
अधिक वाचा: डिजिटल सातबाऱ्याला अखेर कायदेशीर मान्यता; आता सर्व कामांसाठी वापरता येणार हा सातबारा
