कोणत्याही वातावरणात टिकण्याची क्षमता, प्रति एकर जास्त उत्पादनाची खात्री, मनुष्य, पशू-पक्ष्यांसाठी अन्नधान्य, मूल्यवर्धित खाद्यपदार्थ तयार करण्यात होणारा वापर आणि आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे ताकदीचे पीक म्हणून मक्याचे पीक ओळखले जाते.
मक्याच्या पिकाचा मुरघास उत्कृष्ट मानला जातो, त्यामुळे कडब्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. पूर्वी, पाणीपुरवठ्याची साधने कमी असताना, कोरडवाहू जमिनीवरील हमखास उत्पन्नासाठी ज्वारीची लागवड केली जात असे.
पावसावर येणाऱ्या ज्वारीच्या पिकाला नंतर एक-दोन वेळा पाणी मिळाले तरी ती चांगली निसवत असे. ज्वारीचा कडबा जनावरांच्या खाद्यासाठी वापरला जात असे.
त्यावेळी कडब्याला चांगली मागणी होती आणि त्याची कुट्टी करून वजनाने विक्री केली जाई. काही वर्षांपूर्वी सहा-सात रुपये किलो दरात मिळणारी कुट्टी आता दिसत नाही. त्याऐवजी मुरघास तयार होतो आहे.
नगदी पिकाखालील क्षेत्रात वाढ झाल्याने आणि परतीच्या किंवा अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या ज्वारीचे नुकसान होते.
ओला झालेला कडबा काळा पडतो, त्याला बुरशी लागते, त्यामुळे तो जनावरांसाठी खाण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे कडब्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
दुभत्या जनावरांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे कडब्याचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे मक्यापासून चारा बनवण्यास सुरुवात झाली आहे.
मनुष्य अन्नधान्य म्हणून मक्याचा उपयोग करत होता, त्याचबरोबर मक्यापासून उत्तम दर्जाचे पशुखाद्य आणि कोंबड्यांचे खाद्य मिळू शकते, अशी माहिती मिळाली आहे.
मूल्यवर्धित खाद्यपदार्थ
◼️ दुभत्या जनावरांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे कडब्याचे उत्पादन कमी झाले आहे.
◼️ सूप, लोणचे, लाह्या, स्टार्च उद्योग आणि इथेनॉलसाठी मक्याला मोठी मागणी आहे, त्यामुळे मूल्यवर्धित खाद्यपदार्थ म्हणून मक्याला मान्यता मिळाली आहे.
मुरघास बनविण्यासाठी मका सर्वोत्तम मानला जातो. ज्वारी आणि कडवळाचा मुरघास बनवला जातो, परंतु मक्याच्या तुलनेत त्याचा दर्जा ठरत नाही. त्याच्या पानावर बुरशीचे रोग येतात, ते जनावरांना हानीकारक ठरतात. ज्वारी निसवेपर्यंत म्हणजे साठ दिवसांची होत नाही तोपर्यंत चारा म्हणून जनावरांना खायला देता येत नाही, कारण त्याच्यात हायड्रोसायनिक अॅसिड असते, जे रवंथ करणाऱ्या जनावरांसाठी धोकादायक असते आणि प्रसंगी त्याच्या विषामुळे जनावरांचा मृत्यू देखील ओढवू शकतो. - राजेंद्र वाघमोडे, कृषी तज्ज्ञ, इंदापूर
