आपल्या पालक किंवा आजी-आजोबांचे निधन होणे हा कुटुंबासाठी मोठा धक्का असतो. अशा कठीण काळात आर्थिक बाबींकडे लक्ष देणे कोणालाच आवडत नाही, पण भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी बँकांमधील मुदत ठेवींचा प्रश्न मार्गी लावणे अनिवार्य ठरते. अशा परिस्थितीत पैसे मिळविण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
आधी 'नॉमिनी' तपासा
◼️ बंधित एफडीवर कोणी नॉमिनी असेल, तर मृत्यू प्रमाणपत्र आणि ओळखपत्राची पडताळणी करून बँक लगेच पैसे सुपूर्द करते.
◼️ लक्षात ठेवा, नॉमिनी हा पैशांचा 'मालक' नसून तो केवळ 'विश्वस्त' असतो.
◼️ कायदेशीर वारसांत या पैशांचे वाटप नंतर होऊ शकते.
वारसदार नसेल तर काय?
◼️ जर एफडीवर कोणाचेही नाव नसेल, तर बँक कायदेशीर वारस प्रमाणपत्र मागते.
◼️ वारसदार ठरवताना हिंदू वारसा कायद्यानुसार मृताची पत्नी, मुले आणि आई यांचा पहिला हक्क असतो.
कागदपत्रे काय लागतात?
◼️ मृताचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र.
◼️ एफडीच्या मूळ पावत्या किंवा तपशील.
◼️ सर्व हयात कायदेशीर वारसांचे ओळखपत्र आणि पत्ते.
◼️ जर एकाच व्यक्तीला पैसे हवे असतील, तर इतरांचे 'ना हरकत प्रमाणपत्र'
कोर्टाची पायरी आणि मग लागणार वेळ
◼️ रक्कम मोठी असल्यास आणि कुटुंबात वाद असल्यास बँक कोर्टाकडून 'सक्सेशन सर्टिफिकेट' आणण्यास सांगते.
◼️ ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याने त्याला वेळ लागू शकतो. मात्र, लहान रकमांसाठी बँका काही हमीपत्रांच्या आधारे प्रक्रिया सोपी करू शकतात.
महत्त्वाचा सल्ला
◼️ कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यापूर्वी थेट बँकेत जाऊन त्यांच्या अटी समजून घ्या.
◼️ कुटुंबात संवाद असेल तर प्रक्रिया वेगाने होते. कुटुंबात संवाद नसेल, तर मात्र गोष्टी अवघड होतात. कोर्ट-कचेऱ्यांचे प्रकार होतात.
◼️ या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ सांगतात की, या सर्व कटकटी टाळण्यासाठी आपल्या सर्व गुंतवणुकीवर 'नॉमिनी' नोंदविणे हाच सर्वात उत्तम आणि सोपा मार्ग आहे.
अधिक वाचा: Petrol Disel Rate : पेट्रोल-डिझेल व सीएनजीचे दर वाढले; १६ मेपासून 'हे' नवीन दर झाले लागू?
