पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याची भीती अखेर खरी ठरली. निवडणुका संपताच १६ दिवसांतच सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ केली.
इराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर भडकलेले असतानाही निवडणुकांच्या काळात इंधन दरवाढ टाळण्यात आली होती.
आता दरवाढीनंतर राज्यानुसार व्हॅटचे दर वेगळे असल्याने प्रत्येक शहरात नवे भाव कमी-जास्त प्रमाणात बदलले आहेत.
पुण्यातील इंधनाचे प्रति लिटर दर
पेट्रोल, डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे. त्यामुळे पुणे शहरात पेट्रोलचा एक लिटरचा दर १०६.९५ रूपये, स्पीडचे पेट्रोल ११६,०६, डिझेलचा दर ९३.४६ आणि सीएनजीचा दर ९२.२५ रूपये आहे.
प्रमुख शहरांतील नवे दर (₹/लिटर)
शहर | पेट्रोल | डिझेल
◼️ दिल्ली | ९७.७७ | ९०.६७
◼️ मुंबई | १०६.६८ | ९३.१४
◼️ कोलकत्ता | १०८.७४ | ९५.१३
◼️ चेन्नई | १०३.६७ | ९५.२५
सीएनजीचे नवे दर (₹)
◼️ दिल्ली - ७९.०९२
◼️ मुंबई - ८४.००
सीएनजी महागला; घरगुती गॅसचे दर तूर्तास स्थिर
सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. स्वयंपाकाचा गॅस आणि पीएनजीच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पेट्रोल निर्यातीवर टॅक्स
◼️ केंद्र सरकारने पेट्रोल निर्यातीवर प्रति लिटर ३ रुपये विंडफॉल गेन टॅक्स लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
◼️ त्याचवेळी डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) वरील अतिरिक्त शुल्कात कपात करण्यात आली आहे. हे नवे दर १६ मेपासून लागू होणार आहेत.
◼️ अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस शून्य ठेवण्यात आला आहे.
◼️ तसेच देशांतर्गत वापरासाठी विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलवरील विद्यमान करांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
इंधन दरवाढ नाममात्रच
◼️ पेट्रोल-डिझेलच्या ३ रुपयांच्या दरवाढीवर इंडियन ऑइलचे संचालक अरविंद कुमार यांनी ही वाढ 'खूपच अल्प' असल्याचे म्हटले आहे.
◼️ जागतिक दबाव असूनही पुरवठा सुरळीत ठेवण्यास तेल शुद्धीकरण केंद्रे १००% क्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात नागरिकांनी इंधन बचतीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
◼️ इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असून, त्याचा थेट परिणाम अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: Monsoon Alert : मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात किती तारखेला प्रवेश येणार?
