महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीतआंबा महोत्सव झाला. या महोत्सवात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
या महोत्सवाला सांगलीकरांनी मोठा प्रतिसाद दिल्यामुळे ३३ लाख ६० हजार रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.
घुले म्हणाले, आंबा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्पादित झालेल्या आंब्याच्या विविध ३६ जातींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना आंब्याच्या विविध जाती पाहायला मिळाल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादकांनी यावर्षी क्यूआरकोडचा वापर केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.
तसेच रत्नागिरीचा हापूस आंबा उपलब्ध झाल्याचा आनंद ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पाच दिवस चाललेल्या आंबा महोत्सवामध्ये ३३ लाख ६० हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.
राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल व कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनामुळे सांगलीत आंबा महोत्सव यशस्वी झाला आहे. पणनचे अधिकारी ओंकार माने यांनी उपस्थित आंबा उत्पादकांचे आभार मानले.
शेतकऱ्यांना झाला मोठा फायदा
• माळशिरस तालुक्यातील आंबा उत्पादक डॉ. केशव सरगर यांनी कृषी पणन मंडळाचे आभार मानले. पणन मंडळामुळे आम्ही थेट आंब्याची विक्री करायला शिकलो, असेही ते म्हणाले.
• दापोली येथील आंबा उत्पादक सलमान मुकादम यांनी यावर्षी सांगलीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे सांगितले. रत्नागिरी येथील आंबा उत्पादक राधिका जोशी यांनी सांगलीमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्तम विक्री झाल्याचे नमूद केले.