पोर्ले तर्फ ठाणे: आसुर्ले-पोर्ले येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याने चालू गाळप हंगामातील उसाला प्रतिटन १४२ रुपयांचा दुसरा हप्ता सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला असल्याची माहिती कंपनीचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी दिली.
यापूर्वी कारखान्याने विनाकपात ३३०० रुपये पहिला हप्ता दिला होता. दुसऱ्या हप्त्यासह कंपनीने ३४४२ रुपये ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.
यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने ११४ दिवसांत ९ लाख ४१ हजार १९५ मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. साखर उतारा सरासरी १३.३३ इतका राहिल्याने तो देशात उच्चांकी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीने यंदाच्या गळीत हंगामात ऊसबिलाचा पहिला हप्ता प्रतिटन ३३०० रुपयांप्रमाणे दिला होता.
शासनाच्या धोरणानुसार अंतिम साखर उताऱ्याची आकडेवारी निश्चित झाल्यानंतर सोमवारी १४२ रुपयांच्या दुसऱ्या हप्त्यापोटी १३ कोटी ३६ लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले.
कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व ऊस दालमिया कारखान्याकडे गाळपाला पाठविण्याचे आवाहन कंपनीचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी केले आहे. याप्रसंगी कारखान्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
अधिक वाचा: राज्यात १ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर होणार 'एआय'ने ऊस शेती, अनुदानही मिळणार; वाचा सविस्तर