हंगामाच्या सुरुवातीला २३ ते २५ रुपये किलोने विकले गेलेले टरबूज आता व्यापारी ७ ते ८ रुपये किलो दरालाही विचारत नाहीत. परिणामी, लागवडी अन् काढणीचा खर्चही निघेनासा झाला आहे. व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने मेहनतीने वाढवलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरीच शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला विक्रीस बसले आहेत.
अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा शिवारातील अनेक टरबूज उत्पादक शेतकरी शहरात येऊन टरबूज विकत आहेत. यापैकी एक शेतकरी मंगेश नागोलकर यांनी तीन एकरातील टरबूज विक्रीसाठी आणले आहेत. तीन एकरातील पिकासाठी सुमारे चार लाखांवर खर्च करून तेवढी रक्कम वसूल होणे कठीण झाले आहे.
अशातच सध्या टरबुजाला दर मिळत नसला तरी स्वतः मजूर लावून फळे तोडणे, वाहनाने शहरात विक्रीसाठी आणणे आणि सकाळ ते संध्याकाळपर्यंत रस्त्याच्या कडेला बसून फळे विकत आहेत. एवढे सर्व करूनही लागवडीसाठी झालेल्या खर्चाचा हिशेब लागत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.
अतिशय परिश्रमपूर्वक टरबुजाचे पीक घेतले; परंतु माल बाजारात येण्यापूर्वीच भाव कोसळले. आता व्यापारीच फिरकेनासे झाले आहेत. सुरुवातीला २५ रुपये असणारा दर आता सात-आठ रुपयांवर आहे. शेतातच टरबूज तडकत असल्याने काही सुचत नाही. - मंगेश नागोलकर, टरबूज उत्पादक शेतकरी.
शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा
आधीच अस्मानी व सुलतानी संकटांनी मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर ही त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी बाब ठरत आहे. शेतकऱ्यांच्या या बिकट अवस्थेची गांभीर्याने दखल घेत, त्यांच्या शेतमालाला योग्य दर आणि हमीभाव मिळावा, यासाठी शासनाने तातडीने ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण
