कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील केळेवाडी येथील नागझरी प्रकल्प उभारणीच्या अशा पल्लवी झाल्या आहेत. वन्यजिवांची तहान भागवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नागझरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रयत्नशील आहेत. पिंपळगाव खोऱ्यात व्यासपीठावरील कार्यक्रमात हा प्रकल्प सतत चर्चेत राहिला आहे.
किल्ले भुदरगड अरण्य क्षेत्रात हजारो वन्यजीव तहानलेले व्याकुळ होऊन शेताशिवारातील झरे, शेततळे, विहिरीच्या पाण्यावर ताण भागवत आहेत. नागझरी अरण्यात लघु पाटबंधारे प्रकल्प उभारणीसाठी एक उपयुक्त नैसर्गिक भूरचना उपलब्ध आहे. यापूर्वी माजी आमदार बजरंग देसाई यांच्या पुढाकाराने या परिसराची पाहणी झाली आहे.
मात्र, वन हद्दीत ही जागा असल्याने हा प्रकल्प रखडला आहे. मानवळे केळेवाडी मुरुक्टे, तोंडलेवाडी, भांडीबांबर येथील शेतीला वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाची जनतेतून मागणी होत आहे. नागझरी प्रकल्प उभारणीसाठी आठ महिने पाणी स्त्रोत्र असणारा ओढा येथे आहे. हे सगळे पाणी अडवले, तर चार गावांतील पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होणार आहे.
शेतीसाठी कालवा तयार करून सिंचन सोयी होणार आहेत. येथील लघु पाटबंधारे प्रकल्प उभारणीसाठी योग्य भूरचना उपलब्ध आहे. या आरण्यात रानगवे, सांबर, भेकर, डुक्कर, बिबट्या, वाघ, काळवीट, तरस, कोल्हे, लांडगे, वनगाय व वन्यजिवांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. किल्ले भुदरगड परिसरात कोठेही वनतळे नाही. परिणामी वन्यजिवांची तहान भागवण्यासाठी सोय नाही.
नागझरी प्रकल्प झाल्यावर मानवळे परिसरातील शेतीला सिंचन सोयी होणार आहेत. बागायती क्षेत्र वाढणार आहे. वन्य प्राण्यांचा शेतीला होणारा उपद्रव्य कमी होणार आहे. प्रकल्प स्थळाची पाहणी करण्याची मागणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. लवकरच शासकीय अधिकारी यांच्या समवेत प्रकल्प स्थळाची पाहणी केली जाणार आहे. - रामभाऊ कृष्णा शिऊडकर, माजी सरपंच मानवळे.
