सोलापूर : पुढील हंगामाचे नियोजन सुरू असताना जिल्ह्यातील सात साखर सम्राटांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ११५ कोटी रुपयांना अडकवले आहे.
मागील साखर हंगामात गाळपाला आणलेल्या उसाचे २० कारखान्यांनी संपूर्ण पैसे चुकते केले असून चार कारखाने कमी रक्कम देणे आहे.
मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०३ टक्क्यांपर्यंत पाऊस पडला होता. चार जूनपासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर महिन्यातही पडत होता. सततच्या पावसाने उसातील पाणी हटले नाही.
चार पाच महिने उसात पाणी राहिल्याने उसाच्या वजनावर परिणाम झाला होता. ऊस सशक्त होण्याऐवजी अधिक पाण्यामुळे अशक्त राहिल्यानेवजनात घट आली. ऊसउत्पादकांचे पैसे दिले नाहीत.
परिणामी उसाअभावी साखर कारखाने कमी कालावधीत कमी क्षमतेने चालले. जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप कमी झाल्याने साखर उत्पादनही कमी झाले.
ऊस गाळप संपल्यानंतर किमान महिनाभरात उसाचे पैसे मिळतील, असे अपेक्षित होते. मात्र, चार महिन्यानंतरही ऊसउत्पादकांचे पैसे दिले नाहीत.
कारवाईनंतर रक्कम अदा
जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे संपूर्ण पैसे दिले आहेत. आरआरसी कारवाई झालेल्या लोकमंगल बीबीदारफळ व लोकमंगल भंडारकवठे या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचा हिशेब चुकता केला आहे.
एफआरपी चुकते केले आहे
भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्यांने ऊस उत्पादकांचे संपुर्ण पैसे दिल्याने आरआरसी कारवाई मागे घेण्याबाबत साखर आयुक्तांना पत्र दिले आहे. लोकमंगलने एफआरपी पेक्षाही अधिक प्रति टन २७०० व २८०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा ४६५ रूपये प्रति मे टन प्रमाणे एकूण १३ कोटी ८८ लाख इतकी अधिक रक्कम शेतकऱ्यांना अदा केली असल्याचे लोकमंगल कारखान्याचे संचालक पराग पाटील यांनी सांगितले.
कुणाकडे किती बाकी?
जयहिंद शुगर - ३०.७८ कोटी
सिद्धेश्वर कुमठे - २३.८१ कोटी
इंद्रेश्वर शुगर - २२.४६ कोटी
गोकुळ शुगर - १७.२२ कोटी
सिद्धनाथ शुगर - १०.८८ कोटी
मातोश्री लक्ष्मी शुगर - ५.३८ कोटी
स.शि.व. काळे - ४.५ कोटी
भैरवनाथ आलेगाव - ३ कोटी
भैरवनाथ लवंगी - १.२८ कोटी
भीमा सहकारी - १.२७ कोटी
जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई झाली आहे. त्यातील लोकमंगल साखर कारखान्यांने ऊसउत्पादकांचे पैसे दिल्याचे सांगण्यात आले. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. इतर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. - प्रकाश आष्टेकर, सहसंचालक, प्रादेशिक सोलापूर
अधिक वाचा: मान्सून पुन्हा सक्रिय होणार; १३ जूनपासून राज्यात या ठिकाणी पुन्हा धो-धो बरसणार