पुणे : ऊसशेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यासाठी राज्यातील १ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करण्यात येणार आहे.
यातील १० हजार शेतकऱ्यांना व्हीएसआय व राज्य सरकार ९० हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी प्रतिहेक्टरी ९ हजार २५० रुपये अनुदान देणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्यासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या दोन वर्षांसाठीचा ५०० कोटी रुपयांचा निधी एकाच वर्षात वापरू, त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊ, असेही ते म्हणाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर' यावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.
यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, रोहित पवार, जयप्रकाश दांडेगावकर, पी. आर. पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर उपस्थित होते.
पवार म्हणाले, ऊसशेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी व्हीएसआयसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार हा प्रयोग राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे.
त्यासाठी व्हीएसआय ९ हजार २५०, साखर कारखाना ६ हजार ७५० देतील व स्वतः शेतकऱ्याला ९ हजार रुपये टाकावे लागतील. व्हीएसआय राज्यातील १० हजार शेतकऱ्यांना हे अनुदान देईल, तर राज्य सरकार उर्वरित ९० हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी ९ हजार २५० रुपये देईल.
मात्र, यासाठी शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन आणि बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे. ही यंत्रणा शेतकऱ्यांकडे लावल्यानंतर त्यावर देखरेख ठेवण्यासाठी सहायक कृषी अधिकारी यांना निर्देश देण्यात येतील.
याव्यतिरिक्त जे शेतकरी ही यंत्रणा लावू इच्छित असतील त्यांनाही मदत करण्यात येईल. त्यासाठी राज्य सहकारी बैंक साखर कारखान्यांना ६ टक्के दराने कर्ज पुरवठा देण्यात येईल.
मात्र, दिलेले अनुदान कारखान्यांनी त्याच कारणासाठी वापरावेत. यंदाचा साखर हंगाम कारखान्यांसाठी परीक्षा पाहणारा ठरला आहे." ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता राज्य सहकारी बँकेनेही पुढाकार घेतला आहे.
राज्यात प्रायोगिक तत्त्वावर १ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर लावण्यात येणाऱ्या या तंत्रज्ञानासाठी साखर कारखाने आर्थिक मदत करणार आहेत. कारखान्यांना ही मदत देण्यासाठी राज्य सहकारी बँक सहा टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करणार आहे.
प्रती हेक्टरी उत्पादन वाढले पाहिजे
◼️ शरद पवार यांनी कारखान्यांना आता अस्तित्वात असलेल्या यंत्रांचा वापर करण्यासाठी प्रती हेक्टरी उत्पादन वाढले पाहिजे असे नियोजन करावे असा सल्ला दिला. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे.
◼️ मात्र, अपवाद वगळता अन्य केंद्र काम करत नसल्याचे चित्र आहे. हे चांगले नसून, या सर्व केंद्रांना कामाला लावा, अशी सूचना त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना केली.
◼️ तसेच कारखान्यांच्या कृषी विभागानेही यापुढे ऊस उत्पादनात दर्जेदार वाढ, साखर उतारा आणि लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही केली.
◼️ कोकाटे यांनी हे तंत्रज्ञान पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रातही लावले जाईल. शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत भांडवली गुंतवणूक वाढविणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले, तर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी यंदाच्या हंगामाची स्थिती बघता नाबार्डने कारखान्यांना कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत मान्यता दिली आहे.
अधिक वाचा: आता शेतजमिनीचे वाद मिटणार, महसूल विभाग सुरु करतोय हा नवीन उपक्रम; वाचा सविस्तर