सहदेव खोत
पुनवत : शिराळा तालुक्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या भात शेतीसाठी सध्या शेतकऱ्यांनी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत.
अनेक ठिकाणी शेतात वापसा नसला तरीही ट्रॅक्टर, बैलजोड्या तसेच ज्यादा मनुष्यबळ वापरून पेरणी करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत.
यंदा उशिरा का असेना तालुक्यात भात पीक बहरेल, असा विश्वास शेतकऱ्यांना वाटत आहे.
शिराळा तालुक्याला जिल्ह्यात भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. तालुक्यात खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक घेतले जाते. दरवर्षी शेतकरी मे महिन्याच्या मध्यापासून भाताची धूळवाफ पेरणी करतात.
परंतु यावर्षी अवकाळी पावसामुळे तालुक्यातील पेरणीचे सर्व वेळापत्रकच कोलमडून गेले. मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सर्वच भागातील पेरण्या पुढे गेल्या आहेत.
सध्या शेतकऱ्यांनी शेतात वाफसा येईल तशी पेरणी करण्याची धडपड सुरू केली आहे. काही शेतकरी ओलीतच तर काहीजण शेतात चिखल असतानासुद्धा पेरणी उरकण्यासाठी काम करीत आहेत.
अनेक शेतकरी पैरा करून एकमेकांना याकामी मदत करत आहेत. खरीप हंगाम साधण्यासाठी शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी, टोकणी तसेच भात लागणीचे पर्याय निवडले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
हे शिराळी वाण प्रसिद्ध
शिराळा तालुक्यात शिराळी मोठे, चिरमुरे, दोडगे, मासाड, जोंधळे, वांडर इत्यादी भाताच्या जाती प्रसिद्ध आहेत. प्रतिवर्षी पश्चिम भागातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने याची जपणूक करतात. काही शेतकरी या वाणांपासून पीकहीं घेतात. तर बहुतांश शेतकरी संकरित वाणांचा पेरणीसाठी वापर करतात.
पावसाचे संकट असतानाही मी २० गुंठ्यात चिखलातच भाताची टोकण केली आहे. याकरिता जादा मनुष्यबळ लागले. सध्या हे भात चांगले उगवून आले आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता पेरणीसाठी प्रयत्न करावेत. - सोपान साळुंखे, प्रगतशील शेतकरी, ढोलेवाडी
तालुक्यात खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक घेतले जाते. शिराळा तालुक्यात यावर्षी भाताचे क्षेत्र साधारणत ११,५०० हेक्टर असून आतापर्यंत १३३५ हेक्टर म्हणजेच २० टक्के पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतात वाफसा आलेली स्थिती पाहून पेरणी करावी. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून भात रोप लागण करावी. जमीनीतील ओल पाहून निर्णय घ्यावा. - नीलेश अडसुळे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, शिराळा
अधिक वाचा: फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती? फळपिकांच्या पॉप्युलर जाती कोणत्या? वाचा सविस्तर