सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या सन २०२५-२०२६ चालू गळीत हंगाममध्ये गाळपास येणाऱ्या उसासाठी पहिला हप्ता प्रतिटन ३ हजार ३०० रुपयेप्रमाणे देणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून चालू असून सध्या १० हजार मे. टन प्रतिदिन क्षमतेने गाळप होत आहे. आजअखेर एकूण २ लाख ४ हजार २५५ मे. टन गाळप आहे.
जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. तसेच डिस्टीलरीमधून ९ लाख २० हजार लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतलेले आहे.
सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून १ कोटी १५ लाख ५४ हजार ९२० युनिट्सची महावितरण कंपनीस विक्री केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची विकासाची घोडदौड चालू आहे.
गाळप हंगाम २०२५-२६ हा देखील विक्रमी व यशस्विरीत्या पार पडेल अशा प्रकारचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे.
या हंगामामध्ये साधारणपणे १४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून ऊसपुरवठा सातत्याने होण्याच्या दृष्टिकोनातून पुरेशी ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली आहे.
दि. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गळितास आलेल्या उसाची प्रथम हप्त्याप्रमाणे होणारी रक्कम सभासदांच्या बँक खात्यामध्ये २ दिवसांमध्ये वर्ग करीत असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
अधिक वाचा: ओलम साखर कारखान्याने अखेर चालू गाळपाचा दर केला जाहीर; कसा दिला दर?
