नितीन कांबळे
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात यंदा कांद्याच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, एकूण सुमारे ७५ हजार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. विशेषत रब्बी हंगामातील कांद्याची विक्रमी लागवड यंदा झाल्याचे चित्र आहे.
तालुक्यात सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील कांद्याची लागवड झाली असून, पूर्वी ऊस लागवड होत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा कांद्याकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, उत्पादन वाढले असले तरी कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
उत्पादन वाढीच्या तुलनेत बाजारभाव टिकून न राहिल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज जरी भाव घसरले असलेतरी भविष्यात चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
भाव घसरले, नाराजी वाढली
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसून, चांगल्या दर्जाचा कांदा देखील १० ते १२ रुपये, तर काही ठिकाणी १५ ते १६ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. मात्र हे दरही केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
लागवडीचा पॅटर्न बदलतोय
तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे म्हणाले की, यंदा आष्टी तालुक्यात गावरान कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. जवळपास ३० हजार हेक्टर म्हणजेच सुमारे ७५ हजार एकर क्षेत्रावर कांदा लागवड झाली असून, लागवडीचा पॅटर्न बदलताना दिसत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
बाजारात मोठी आवक
आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत दर आठवड्याला सुमारे ५० ते ६० हजार कांदा गोण्यांची आवक होत असून, त्यामुळे बाजारावर ताण वाढला आहे.
