मच्छिंद्र देशमुख
कोतूळ : शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याची सतत ओरड होते. मात्र, कोतूळ येथील शेतकऱ्याने पंधरा वर्षे जुन्या डाळिंब बागेची छाटणी करून १५ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
कोतूळ येथील शेतकरी भानुदास नानाभाऊ देशमुख यांनी आपल्या दीड एकर शेतीत १५ वर्षापूर्वी आरक्ता ही डाळिंब बाग लावली.
काही वर्ष जेमतेम उत्पादन मिळाले. कधी भाव कमी-जास्त झाले. गेल्या दोन वर्षांपूर्वी त्यांनी तळापासून काही अंतरावर बाग तोडली.
चांगले फुटवे आले. हिवाळी बहार आला. खते, पाणी, औषधे यांचे योग्य नियोजन केले, त्यासाठी शेणखत, रासायनिक खते यांचे योग्य नियोजन केले.
बाग नियोजन खर्च अडीच लाख रुपये आला. सध्या एका खासगी व्यापाऱ्याला १२१ रुपये किलोने डाळिंब फळे दिली. शेवटपर्यंत १५ टन माल निघेल. त्यातून १४ ते १५ लाख रुपये मिळणार आहेत.
फळबाग हा किफायतशीर शेती उत्पादन व्यवसाय आहे. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन व आर्थिक फायदा देणारे पीक आहे. कोतूळ येथील शेतकरी भानुदास देशमुख यांनी पंधरा वर्षे जुनी डाळिंब बाग योग्य छाटणी करून उत्पादन घेतले आहे. - अतुल पवार, तालुका कृषी अधिकारी
अधिक वाचा: शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अखेर मंजुरी; आता 'या' १३ जिल्ह्यांतून जाणार हायवे
