निरोगी व सशक्त राहण्यासाठी शारीरिक श्रमासोबत आहारसुद्धा खूप महत्वाचा आहे. जागतिक आरोग्य संघटना व भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था यांच्या मते एका तरुण व्यक्तीने दिवसामध्ये कमीतकमी १००-४०० ग्रॅम भाज्या व फळे खाल्ली पाहिजेत.
परंतु, ही फळे व भाज्या खरेच विषमुक्त असतात का? कारण, लागवडीपासून ते आपल्या स्वयंपाकघरात येईपर्यंत त्यावर खूप वेगवेगळ्या रसायनांचा मारा केला जातो व या सर्व रासायनिक घटकांचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होत असतो.
यावर उपाय म्हणून आपण नैसर्गिक घटकांचा वापर करून फळे व भाज्या निर्जंतुक करण्यासाठी घरच्या घरीच 'शाम्पू' बनवू शकतो. चक्रावलात ना? पण ही गंमत नव्हे, बघा आपण केसांना शाम्यू लावतो.
शरीर स्वच्छ करण्यासाठीदेखील शाम्पू मिळतात. केसांची, शरीराची स्वच्छता करण्यासाठी शाम्पू असतात, तसाच फळे व भाज्यांची स्वच्छता करण्यासाठी शाम्पू बनविता येतो. सर्व स्तरातील कुटुंबांना याची नितांत गरज आहे.
फळे ताजीतवानी व आकर्षक दिसण्यासाठी त्यांना रासायनिक रंग व मेण लावले जाते. भाज्या टवटवीत, स्वच्छ दिसण्यासाठी त्यावर पाणी फवारले जाते. परंतु, त्या फवारलेल्या पाण्याच्या व विक्रेता बसलेल्या परिसराच्या स्वच्छतेबाबत शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे.
अनेक घरांमध्ये फळे आणि भाज्या धुण्यासाठी रासायनिक द्रावणे वापरली जातात. परंतु ही द्रावणे हानिकारक असू शकतात. त्यामुळे नैसर्गिक व घरगुती पद्धतीने फळे व भाज्या धुण्याचे द्रावण तयार करणे हा एक चांगला पर्याय आहे.
असा तयार करा शाम्पू...
• सामग्री - एक कप स्वच्छ पाणी, एक कप व्हिनेगर किंवा थोडे ताक (शक्यतो व्हिनेगर), एक चमचा बेकिंग सोडा.
• वैकल्पिक - थोडीशी रिठ्याची पावडर किंवा शिकेकाई पावडर ( फेस येण्यापुरती).
काय करावे?
हे सर्व पदार्थ एकत्र करा आणि नीट ढवळून काढा त्यानंतर स्वच्छ कापडाने गाळून घ्या. आता हे दावण एका स्प्रे बाटलीमध्ये भरुन घ्या.
कशी स्वच्छ करावीत फळे?
• हे द्रावण फळे व भाज्यांवर स्प्रे करावे व १-२ मिनिटे थांबावे.
• नंतर साध्या पाण्याने धुवावे व कोरडे करून घ्यावे.
• आता भाज्या व फळे स्वच्छ झाली. कापण्यासाठी घ्या व खा.
पुन्हा कधी बनवाल?
हे द्रावण तयार करणे, वापरणे सोपे आणि सुरक्षित आहे. यामुळे फळे व भाज्यांवरील रोग तयार करणारे जीवजंतू कीटकनाशके, मेण आणि माती काढून टाकली जाते. परंतु, हे द्रावण जास्तीतजास्त ३-४ दिवस वापरता येते. त्यानंतर ते पुन्हा नव्याने बनवावे लागते; कारण, जुन्या द्रव्याचा परिणाम कमी होतो.
डॉ. प्रवीण वसंतराव देशमुख
सदस्य, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
