श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवेगार गालीचे तयार झालेले असतात. भात लावणीची कामे पूर्ण झालेली असतात. त्यामुळे सर्वजण आनंदी झालेले दिसतात.
आपल्या या पर्यावरणात प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक घटकाला तेवढेच महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी वारूळाच्या ठिकाणी जाऊन नाग देवतेची पूजा केली जाते.
कारण पूर्वीपासून मानव हा निसर्गपूजक आहे. साप हा 'शेतकऱ्याचा मित्र' आहे असे म्हटले जाते. कारण श्रावण महिन्यात भातशेतीची लावणी पूर्ण झालेली असते, काही दिवसानंतर त्या शेतीत धान्य तयार होणार असते.
उंदीर, कीड, कीटक यांचे प्रमाण वाढले तर ते सर्व धान्य फस्त करतील आणि शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही. त्यामुळे सापांचे रक्षण करणे व त्यांना देव मानणे म्हणजे आपल्या निसर्गपूजेसह, पिकांचे रक्षण करणे होय, कारण साप उंदीर, कीड, कीटक यांना खाऊन पिकांचे रक्षण करतात. म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात.
नागपंचमी हा सण प्रत्येक महिलेला तणावातून मुक्त होण्याचा सण आहे. महिलेने माहेरी यावे, आपल्या बालमैत्रिर्णीसोबत खेळावे, गाणी म्हणावी आणि फुगड्या घालाव्यात म्हणजेच त्या तणावातून मुक्त होऊन आनंद मिळवू शकतील. नोकरी आणि संसार यातील कसरत करताना त्यातून थोडा विरंगुळा मिळावा, हा उद्देश आहे.
नागपंचमीच्या निमित्ताने आपण सापांबाबत असलेला गैरसमज दूर करून, सापांचे महत्त्व लोकांना समजावून देऊया. 'पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सापांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.' त्यामुळे पूजेसाठी नैसर्गिक पाने, फुले आणि इतर साहित्य वापरणे ही बाब चांगली आहे. शास्त्रीयदृष्ट्या हा सण जैवविविधता वाचवण्यासाठीचा आहे.
सापांविषयी जनजागृती होणे गरजेचे
◼️ भारतामध्ये सापांच्या ३३५ प्रजाती आढळतात, त्यापैकी २२३ प्रजाती बिनविषारी आहेत, ४५ निमविषारी आणि ७० प्रजाती विषारी आहेत.
◼️ महाराष्ट्रात नाग, मण्यार, घोणस, फुरसे या विषारी जाती आहेत. हे विषारी साप चावल्यास दवाखान्यात वेळेत उपचार केल्यास माणूस वाचतो.
◼️ बऱ्याच वेळा आपण सापांना पाहूनच घाबरून अर्धे गर्भगळीत होतो.
◼️ आज सर्पमित्र आणि पर्यावरणप्रेमी सापांविषयी जागरूकता वाढवत आहेत, ज्यामुळे लोकांच्या मनात जागृती येत आहे. ही बाब छान आहे.
◼️ या नागपंचमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी असा संकल्प करूया की निसर्गातील अन्नसाखळीचा समतोल ढासळू देणार नाही आणि या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जेवढे प्रयत्न होतील तेवढे करीन.
- राजेंद्र जयवंत रांगणकर
गणेशगुळे, रत्नागिरी
अधिक वाचा: Ranbhajya : जीवनसत्वाचा खजिना असणाऱ्या 'या' रानभाज्या खा अन् आजारापासून दूर रहा