अकोला : पारंपरिक शेतीसोबतच पूरक व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येत असून महाराष्ट्राने अपारंपरिक रेशीम उत्पादनात देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Sericulture Farming)
राज्यात तुती आणि टसर अशा दोन प्रकारच्या रेशीम कोशांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात असून, यंदा राज्यात तब्बल ५ हजार ७६२ मेट्रिक टन तुती रेशीम कोशांचे उत्पादन झाले आहे.(Sericulture Farming)
विशेष म्हणजे अपारंपरिक रेशीम उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्राने देशात अग्रक्रम मिळविला असून राज्यात शंभर टक्के बायोव्होल्टाइन प्रकारच्या कोशांचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रेशीम उद्योग आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.(Sericulture Farming)
२३ हजार एकरांवर तुतीची लागवड
राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तुती लागवडीकडे वळण्यास सुरुवात केली आहे. सध्या राज्यात २३ हजार १८८ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली आहे.
या लागवडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रेशीम कोशांचे उत्पादन होत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा उद्योग उत्पन्नाचा नवा पर्याय बनत आहे.
कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारा उद्योग म्हणून रेशीम व्यवसायाकडे पाहिले जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पारंपरिक पिकांसोबत रेशीम उत्पादनालाही प्राधान्य देत आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभाग राज्यात अव्वल
तुती रेशीम उत्पादनात छत्रपती संभाजीनगर विभागाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या विभागात ४४.९३ लाख चॉकी कीटकांचे वितरण करण्यात आले असून त्यातून तब्बल ३ हजार १३५ मेट्रिक टन रेशीम कोशांचे उत्पादन घेण्यात आले आहे.
या यशामुळे मराठवाडा विभाग रेशीम उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे.
पुणे विभाग दुसऱ्या स्थानावर
पुणे विभागात २९.१८ लाख अंडीपुंजांचे वितरण करण्यात आले. त्यातून २ हजार ९० मेट्रिक टन रेशीम कोशांचे उत्पादन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातही शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळताना दिसत आहेत.
अमरावती विभागात ४४७ मेट्रिक टन उत्पादन
अमरावती विभागात ६.६६ लाख अंडीपुंजांचे वितरण करण्यात आले असून ४४७ मेट्रिक टन तुती रेशीम कोशांचे उत्पादन घेण्यात आले आहे. विदर्भातील काही भागांमध्येही रेशीम उद्योगाचा विस्तार होत असल्याचे चित्र दिसत आहे.
टसर रेशीम उत्पादनालाही चालना
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत पारंपरिक पद्धतीने टसर रेशीम उत्पादन घेतले जाते. यंदा या भागांत १३०.७८ लाख टसर कोशांची निर्मिती झाली आहे.
या कोशांपासून सुमारे ७.१२ मेट्रिक टन रेशीम धागा तयार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जंगल क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये टसर रेशीम उद्योग ग्रामीण आणि आदिवासी भागातील रोजगाराचे महत्त्वाचे साधन बनत आहे.
नागपूर विभागातही उत्पादन वाढ
नागपूर विभागात १.२४ लाख अंडीपुंजांचे वितरण करण्यात आले असून त्यातून ८८ मेट्रिक टन तुती रेशीम कोशांचे उत्पादन घेण्यात आले आहे. विदर्भातील शेतकरी आता पर्यायी शेती व्यवसाय म्हणून रेशीम उत्पादनाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
बीडची बाजारपेठ राज्यात सर्वांत मोठी
बीड येथील रेशीम कोश बाजारपेठ ही राज्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ मानली जाते. येथे मोठ्या प्रमाणावर रेशीम कोशांची खरेदी-विक्री केली जाते.
याशिवाय बारामती, जालना, पूर्णा आणि सोलापूर येथेही रेशीम कोश बाजारपेठा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
रेशीम उद्योग ठरतोय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
कमी खर्च, कमी जागा आणि कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारा उद्योग म्हणून रेशीम व्यवसायाकडे पाहिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा उद्योग समृद्धीकडे नेणारा प्रभावी पर्याय ठरत आहे.
कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी समृद्धीकडे नेणारा प्रभावी पर्याय ठरू शकतो. त्यामुळे येत्या खरीप हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांनी तुती लागवडीकडे वळून रेशीम उद्योग सुरू करावा. - डॉ. महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम विभाग
अधिक वाचा : Farmer Success Story : उन्हाळ्यातही दोडक्याने दिला भरघोस नफा; आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा
