Sericulture Farming : पारंपरिक शेतीला शाश्वत जोडधंद्याची जोड देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या 'महारेशीम अभियानाला' धाराशिव जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.(Sericulture Farming)
कमी खर्च, कमी पाणी आणि दीर्घकालीन उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. (Sericulture Farming)
यंदा जिल्ह्याला तब्बल १,९०० एकर क्षेत्रावर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.(Sericulture Farming)
शासनाने रेशीम विभागाला ६५० एकर, कृषी विभागाला ६०० एकर आणि जिल्हा परिषदेला ६५० एकर असे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे.
मात्र, ५ मेपर्यंत रेशीम विभाग आणि कृषी विभाग मिळून एकूण ५०९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये रेशीम विभागाने २८६ तर कृषी विभागाने २२३ शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेने अद्याप एकाही शेतकऱ्याची नोंदणी केलेली नाही.
कमी खर्चात अधिक नफा
रेशीम शेती हा कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय मानला जातो. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर पुढील १० ते १५ वर्षे सातत्याने उत्पन्न मिळू शकते. शिवाय या शेतीला तुलनेने कमी पाणी लागते. त्यामुळे कमी भूधारक शेतकऱ्यांसाठीही हा पर्याय फायदेशीर ठरत आहे.
धाराशिव जिल्ह्याचे हवामान आणि भौगोलिक परिस्थिती रेशीम उद्योगासाठी पोषक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशीम शेतीचा विस्तार करण्यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे.
शासनाकडून भरीव अनुदान
महारेशीम अभियानांतर्गत शासनाकडून तुती लागवड, खते, मजुरी तसेच रेशीम किड्यांच्या संगोपनासाठी लागणाऱ्या गृहबांधणीसाठी भरीव अनुदान दिले जाते.
'मनरेगा योजने'अंतर्गतही या कामांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय सहज सुरू करता येत आहे.
रेशीम कोशांना बाजारात चांगली मागणी
रेशीम उद्योगातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रेशीम कोश. बाजारपेठेत या कोशांना सध्या चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आकर्षक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पारंपरिक पिकांसोबत रेशीम शेतीकडे वळत आहेत.
रेशीम शेती का फायदेशीर?
एकदा तुती लागवड केल्यास १० ते १२ वर्षे उत्पन्न
कमी पाण्यात आणि कमी खर्चात उत्पादन
शासनाकडून भरीव अनुदान
रेशीम कोशांना बाजारात चांगला दर
लहान भूधारक शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर व्यवसाय
शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन
जिल्हा रेशीम कार्यालयाकडून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत नोंदणी झालेल्या क्षेत्राव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्रासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी खर्चात रेशीम शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. शासनाकडून अनुदान आणि तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. आर्थिक समृद्धीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी.-ए. व्ही. वाकुरे, जिल्हा रेशीम अधिकारी
हे ही वाचा सविस्तर : Humani Pest Control : शेतकऱ्यांसाठी अलर्ट! 'ही' किड पिकं उद्ध्वस्त करतेय
अधिक वाचा : Farmer Jugaad : असह्य उष्णता, करपणारी पिकं… आणि अचानक एक भन्नाट जुगाड वाचा सविस्तर
