Humani Pest Control : बदलत्या हवामानामुळे आणि उन्हाळ्यातील अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हुमणी (white grub) किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.(Humani Pest Control)
या किडीमुळे खरीप हंगामातील प्रमुख पिकांना मोठा धोका निर्माण झाला असून, नियंत्रण न केल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.(Humani Pest Control)
कोणत्या पिकांना सर्वाधिक फटका?
हुमणी किडीचा सर्वाधिक परिणाम सोयाबीन, कापूस, ऊस, हळद आणि आले या पिकांवर होत आहे.
ही किड मुळांवर आघात करते, त्यामुळे रोपे वाळू लागतात आणि उत्पादनात ३० ते ८० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. काही ठिकाणी तर संपूर्ण पिके नष्ट होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
प्रादुर्भाव वाढण्यामागचे कारण
तज्ज्ञांच्या मते, अवकाळी पावसामुळे जमिनीखाली सुप्त अवस्थेत असलेले भुंगेरे बाहेर येतात. त्यानंतर उष्ण आणि कोरडे हवामान त्यांना पोषक ठरते.
विशेषतः मे महिन्याच्या अखेरीस हे भुंगेरे झुंडीने बाहेर पडून झाडांवर एकत्र येतात आणि प्रजनन करतात.
भुंगेऱ्यांचे वर्तन कसे असते?
हे भुंगेरे संध्याकाळच्या वेळी बाभूळ, कडुलिंब आणि बोर यांसारख्या झाडांवर जमतात. याच ठिकाणी नर-मादीचे मिलन होते. त्यानंतर हे भुंगेरे २ ते ३ किलोमीटर परिसरात अन्नाच्या शोधात फिरतात आणि शेतीत पसरतात.
सामूहिक नियंत्रण का गरजेचे?
हुमणी किडीवर एकट्याने नियंत्रण करणे फारसे प्रभावी ठरत नाही. गावपातळीवर सामूहिकरीत्या उपाययोजना केल्यासच या किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येतो.
प्रकाश सापळे लावणे, झाडांवरून भुंगेरे गोळा करणे यांसारख्या उपायांना विशेष महत्त्व आहे.
नुकसान टाळण्यासाठी तातडीची पावले
वेळेवर प्रादुर्भाव ओळखणे
प्रौढ भुंगेरे अवस्थेत नियंत्रण करणे
उशीर झाल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान
तज्ज्ञांच्या मते, हुमणी किडीवर नियंत्रणासाठी अळी अवस्थेपेक्षा प्रौढ भुंगेऱ्यांवर नियंत्रण ठेवणे अधिक प्रभावी ठरते.
नियंत्रणासाठी उपाययोजना
उन्हाळ्यात खोल नांगरणी करून भुंगेरे बाहेर काढणे
उघड झालेले भुंगेरे हाताने गोळा करून नष्ट करणे
रात्री झाडांच्या फांद्या हलवून भुंगेरे खाली पाडणे
प्रकाश सापळ्यांचा वापर करून भुंगेरे पकडणे
आवश्यकतेनुसार क्लोरोपायरीफॉस फवारणी
मेटारायझियम बुरशी शेणखतात मिसळून जमिनीत टाकणे
हुमणी किडीवर नियंत्रणासाठी प्रौढ भुंगेरे अवस्थेतच उपाय करणे सर्वाधिक प्रभावी ठरते. शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या उपाययोजना केल्यासच मोठे नुकसान टाळता येईल.- प्रवीण पी. देशपांडे, कीटकशास्त्र तज्ज्ञ
हुमणी किडीचा वाढता प्रादुर्भाव हा खरीप हंगामासाठी गंभीर इशारा ठरत आहे. वेळेवर उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येऊ शकते; अन्यथा दुबार पेरणीसारखे संकट ओढवू शकते.
हे ही वाचा सविस्तर :Zero Energy Cool Chamber : शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर! वीज न वापरता शेतमाल साठवण्याची सोपी ट्रिक; नफाही वाढणार
अधिक वाचा : Farmer Biogas Success Story : सिलिंडर टंचाई? 'या' शेतकऱ्याने शेणातून तयार केला गॅस; खर्च झाला शून्य!
