Farmer Jugaad : मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात उष्णतेचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेल्याने भीषण उकाड्याने जनजीवन होरपळून निघाले आहे.
या प्रखर उन्हाचा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे, तर शेतातील पिकांनाही बसत आहे. डोळ्यांसमोर पिके करपत असल्याचे दृश्य पाहून शेतकरी हवालदिल झाले असले, तरीही 'हार मानायची नाही' या जिद्दीने शेतकरी आपल्या पिकांना वाचवण्यासाठी विविध उपाययोजना करताना दिसत आहे.
साड्या आणि क्रॉप कव्हरचा आधार
उन्हाच्या तीव्रतेपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी आता घरगुती उपायांकडे वळले आहेत.
शेतात लहान रोपे, भाजीपाला आणि फळझाडांवर जुन्या साड्या, पांढरी पातळे आणि क्रॉप कव्हर टाकून सावली निर्माण केली जात आहे.
काही ठिकाणी शेडनेटमध्येही डबल जाळी टाकून पिकांचे रक्षण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पाण्याची टंचाई; कसरती वाढल्या
हिंगोली जिल्ह्यातील विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
उपलब्ध पाणी अपुरे पडत असल्यामुळे पिकांना जिवंत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करावे लागत आहे. अनेक शेतकरी रात्री किंवा पहाटे पाणी देऊन बाष्पीभवन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पिकांवर उष्णतेचा परिणाम
कडक उन्हामुळे पिकांची पाने पिवळी पडून जळू लागली आहेत. भाजीपाला आणि बागायती पिकांवर विशेष परिणाम दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पिकांभोवती पालापाचोळा किंवा मल्चिंग पेपर टाकून ओलावा टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जुगाडातून उभं राहतंय संरक्षण
अत्याधुनिक साधनांची कमतरता असतानाही शेतकरी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून स्वस्त आणि प्रभावी उपाय शोधत आहेत.
घरातील उपलब्ध साड्या, कपडे, जाळ्या यांचा वापर करून शेतात सावलीचे छत उभारले जात आहे. हा जुगाडच सध्या पिकांसाठी जीवनदायी ठरत आहे.
तापमान ४२ अंशांवर; संकट कायम
जालना जिल्ह्यात तापमान ४२ अंशांवर पोहोचल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. विशेषतः भोकरदन परिसरातील शेडनेटमधील पिके आणि भाजीपाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
अजून महिनाभर उष्णतेचा तडाखा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील एक ते दीड महिना उष्णतेची ही तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही लढाई अजून कठीण होणार आहे.
तज्ज्ञांचा सल्ला
कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पुढील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
पिकांभोवती मल्चिंग किंवा पालापाचोळा वापरा
शक्यतो रात्री किंवा पहाटे पाणी द्या
लहान रोपे आणि झाडांना सावली द्या
पाण्याचा काटकसरीने वापर करा
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी आपल्या 'काळ्या कुशीतल्या लेकरांना' म्हणजेच पिकांना वाचवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
ही केवळ शेती नव्हे, तर जिद्द, प्रेम आणि संघर्षाची जिवंत कहाणी आहे. जी प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी आहे.
हे ही वाचा सविस्तर : Gas New Rules Update : १ मेपासून गॅस मिळवणं सोपं नाही; 'हे' नवे नियम जाणून घ्या
