विजय मुंडे
जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी आता केवळ घरापुरतेच न राहता उद्योजकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे.(Jalna Jeevika success)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४५ हजार ३०३ महिला आज सक्षम उद्योजिका म्हणून पुढे आल्या आहेत.(Jalna Jeevika success)
जिल्हा परिषद, जालना यांच्या माध्यमातून या अभियानाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले आहे.(Jalna Jeevika success)
स्वयंसाहाय्यता गटांचा मजबूत पाया
२०१२-१३ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात १५ हजार २३४ स्वयंसाहाय्यता गटांची स्थापना झाली आहे.
या गटांच्या माध्यमातून महिलांना संघटित करताना त्यांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली. परिणामी, महिलांनी शेतीसोबतच विविध पूरक व्यवसायातही सक्रिय सहभाग घेतला आहे.
'जालना जीविका' ब्रँडची बाजारपेठेत हवा
'जालना जीविका' या ब्रँडखाली तयार होणाऱ्या उत्पादनांनी आता स्थानिकच नव्हे तर व्यापक बाजारपेठेतही ओळख निर्माण केली आहे.
मसाले, डाळी, पापड तसेच विविध हस्तकलेच्या वस्तू आकर्षक आणि दर्जेदार पॅकिंगमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. या ब्रँडमुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना विश्वासार्हता आणि स्थिर बाजारपेठ मिळाली आहे.
तंत्रज्ञान आणि अर्थसहाय्याची जोड
राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक प्रकल्प अंतर्गत महिलांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येत असून 'वन स्टॉप फॅसिलिटी सेंटर'च्या माध्यमातून मार्गदर्शनही केले जात आहे.
बँकांकडून मिळालेल्या १९७ कोटी रुपयांच्या कर्जामुळे महिलांनी अगरबत्ती उत्पादन, लाकडी खेळणी, प्रक्रिया उद्योग यांसारख्या बिगरशेती व्यवसायातही मोठी झेप घेतली आहे.
'उमेद मार्ट'- महिलांसाठी हक्काची बाजारपेठ
महिलांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी जालना शहरात 'उमेद मार्ट' सुरू करण्यात आले आहे.
येथे उत्पादनांची किरकोळ विक्री होत असून ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारेही विक्रीची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे महिलांच्या उत्पादनांना योग्य दर आणि व्यापक ग्राहकवर्ग मिळत आहे.
आकडेवारीतून दिसणारी प्रगती
एकूण महिला कुटुंबे: १,४५,३०३
स्वयंसाहाय्यता गट: १५,२३४
उत्पादक संघ: ३६७
शेतकरी उत्पादक कंपन्या: १२
बँक कर्ज (२०२४-२५): १९७ कोटी रु.
महिलांमध्ये प्रचंड कौशल्य
जिल्ह्यातील ग्रामीण महिलांमध्ये प्रचंड कौशल्य आहे. 'उमेद'च्या माध्यमातून आम्ही त्यांना केवळ भांडवलच नव्हे, तर 'जालना जीविका'सारखा स्वतः चा ब्रँड आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. महिलांचा उत्पादक ते उद्योजिका हा प्रवास जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा आहे.- डॉ. कृष्णकांत कनवारिया, सीईओ, जिल्हा परिषद जालना
जालना जिल्ह्यातील महिलांनी 'उमेद'च्या बळावर आर्थिक स्वावलंबनाकडे टाकलेले हे पाऊल ग्रामीण विकासाचा आदर्श ठरत आहे. 'जालना जीविका'सारख्या ब्रँडमुळे महिलांच्या कष्टाला योग्य मूल्य मिळत असून, हीच चळवळ भविष्यात आणखी व्यापक स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा :Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू
