Cotton Sowing : विदर्भात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मृगसरींनी शेतकऱ्यांची उत्सुकता वाढवली असून अमरावती जिल्ह्यात काही भागांमध्ये कपाशी लागवडीस प्रारंभ झाला आहे. (Cotton Sowing)
ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पेरणीची लगबग वाढली आहे. मात्र, सोयाबीन पेरणीसाठी आवश्यक असलेल्या ८०-१०० मिमी पावसाअभावी बळीराजा अजूनही आभाळाकडे डोळे लावून आहे. दरम्यान, एचटीबीटी बियाण्यांचा (HTBT Seeds) शिरकाव आणि दोन वाणांचा तुटवडा यंदाही शेतकऱ्यांसमोर आव्हान ठरत आहे.(Cotton Sowing)
विदर्भात मान्सून दाखल होत असल्याची शुभवार्ता भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली. या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सुरु असलेल्या मृगसरींनी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपविली व शिवारामध्ये कपाशी पेरणीची लगबग सुरु झालेली आहे. (Cotton Sowing)
सोयाबीन पेरणीला मात्र किमान १०० मिमी पावसाची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी निर्धारित वेळेच्या आत मान्सून राज्यात प्रवेशित झाला असला तरी नंतर त्याची गती मंदावल्याने पाच आठ दिवस कोरड्यात गेले व तापमानही वाढले होते.
आता मात्र मान्सूनसाठी पोषक स्थिती असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ढगाळ वातावरण व तीन दिवसांपासून सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यात शनिवारी रा सार्वत्रिक पाऊस झाला तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली
सोयाबीनसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा
कपाशी लागवडीला जरी प्रारंभ झाला असला तरी सोयाबीन पेरणीसाठी किमान ८० ते १०० मिमी पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे दमदार पाऊस होत नाही. तोवर सोयाबीनची पेरणी टाळावी.
'त्या' दोन वाणाचा यंदाही तुटवडा
कपाशी लागवडीसाठी एका कंपनीच्या दोन वाणांची सर्वाधिक मागणी आहे. मात्र पुरवठा कमी होत असल्याने तुटवडा होत आहे. गतवर्षी याच वाणांच्या बियाण्यासाठी कृषी विभागाने संबंधित केंद्रांमध्ये कृषी सहायकाची नियुक्ती केली होती व पोलिसांच्या बंदोबस्तात बियाण्यांची विक्री केली होती.
प्रस्तावित क्षेत्र | ८,८५,९०० |
सोयाबीनचे क्षेत्र | २,६७,८०० |
कपाशीचे क्षेत्र | २,४९,५०० |
तुरीचे क्षेत्र | १,२१,००० |
'एचटीबीटी' चा शिरकाव, फसवणूक टाळा
यंदा मोठ्या प्रमाणात शासनाद्वारे प्रतिबंधित 'एचटीबीटी' (HTBT) बियाण्यांचा शिरकाव गुजरात राज्यातून झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० ठिकाणी धाडी टाकून हे बियाणे जप्त करण्यात आलेले आहे. या बियाण्यांच्या नावाआड आता फसवणुकीचे प्रकार होत असल्याने शेतकऱ्यांनी प्रलोभनाला बळी पडू नये, अधिकृत दुकानातून बियाणे घेऊन पक्की पावती घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन आहे.
काही भागात कपाशी लागवड सुरु झालेली आहे. सोयाबीन पेरणीसाठी किमान ८० ते १०० मिमी पाऊस आवश्यक आहे. घरगुती बियाणे असल्यास बीजप्रक्रिया करावी, उगवण तपासावी, बियाणे अधिकृत दुकानातून घ्यावे व पक्की पावती घ्यावी. - वरुण देशमुख, उपसंचालक (कृषी)