पालघर : डहाणू तालुक्यातील वाढवण येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी भूसंपादनाचा दर जाहीर करण्यात आला आहे.
या भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली.
प्रकल्पासाठी आवश्यक रस्ता व रेल्वे उभारणीसाठी जमीन संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी दिली.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री (दूरदृश्य प्रणालीद्वारे), उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, श्याम मदनुकर, भूमी अभिलेख अधीक्षक नरेंद्र पाटील, पालघरतहसीलदार रमेश शेंडगे, डहाणू तहसीलदार सुनील कोळी, मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, १९५६च्या कलम ३ (१) अन्वये २९ ऑगस्ट २०२४ रोजी केंद्र सरकारच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, पालघर जिल्ह्यातील एकूण २४ गावांचा यात समावेश आहे.
२४ गावांत संपादन निश्चित
◼️ डहाणू तालुक्यातील १० व पालघर तालुक्यातील १४ गावांतील जमिनींचे संपादन निश्चित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
◼️ पालघर तालुक्यासाठी सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे, तर डहाणू तालुक्यासाठी सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सुर्या प्रकल्प, डहाणू येथे संपर्क साधावा.
◼️ भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, वेग आणि न्याय सुनिश्चित करणे, ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. बाधित नागरिकांनी कागदपत्रांची वेळेत पूर्तता करून मोबदला स्वीकारावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
निश्चित दर जाहीर
◼️ पालघरमधील बहुतांश गावांसाठी शेतजमिनीचा दर प्रतिहेक्टर ६२ लाख ५० हजार रुपये निश्चित करण्यात आला असून, बिनशेती जमिनींसाठी गावनिहाय प्रति चौ. मी. ७८० ते २,९४० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे.
◼️ डहाणू तालुक्यातील वरोर, चिंचणी, तणाशी या गावांसाठी शेतजमिनीचा दर १ कोटी १६ लाख ४४ हजार १०६ रुपये प्रतिहेक्टर, तर बावडे, कोलवली, वाणगाव या गावांसाठी १ कोटी २२ लाख ४२ हजार ४०८ रुपये प्रतिहेक्टर असा निश्चित केला आहे.
◼️ काही गावांसाठी ६२ लाख ५० हजार रुपये प्रतिहेक्टर दर लागू राहील.
◼️ सर्व निवाडे संपादन संस्था नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया National Highways Authority of India (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते आणि त्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
◼️ प्रकल्पग्रस्तांना निश्चित बाजारमूल्याच्या दुप्पट रकमेचा मोबदला देण्यात येणार आहे. त्यासोबतच त्या रकमेवर १०० टक्के दिलासा रक्कम, तसेच २९ ऑगस्ट २०२४ पासून मूळ दरावर १२ टक्के अतिरिक्त घटक (व्याज) देण्यात येणार आहे.
◼️ जमिनीवरील बांधकाम, झाडे, विहीर, बोअरवेल आदी मालमत्तांचे मूल्यांकन करून स्वतंत्र नुकसानभरपाईही दिली जाणार आहे.
सर्व कागदपत्रे गरजेची
६० दिवसांच्या आत अद्ययावत ७/१२ उतारा, फेरफार नोंदी, ओळखपत्र, बँक पासबुक (IFSC सहीत), वारस हक्काचा पुरावा (लागू असल्यास) आदी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. संपादित क्षेत्राचा मोबदला मिळणे सोपे जाईल.
अधिक वाचा: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार का? वाचा सविस्तर
