शिवानंद घुगे
जालना जिल्ह्याची ओळख असलेल्या मोसंबीच्या बागा आता अंबड तालुक्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील हस्तपोखरी आणि परिसरात सध्या शेतीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. वर्षानुवर्षांच्या पारंपरिक मोसंबी बागांवर शेतकरी थेट जेसीबी फिरवत असून, त्याऐवजी पेरू लागवडीला पसंती दिली जात आहे.
बदलत्या हवामानाचा फटका आणि बाजारात मिळणारा अल्प भाव यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता पेरूच्या रूपाने अधिक फायदेशीर पर्याय निवडला आहे. गेल्या २-३ वर्षांपासून मोसंबी बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. सततचे बदलणारे वातावरण आणि बागांवर पडणारे विविध रोग यामुळे उत्पादनात मोठी घट झाली.
१०० एकरवर नवीन लागवड
अंबड तालुक्यातील हस्तपोखरी परिसरात सध्या जवळपास १०० एकर क्षेत्रावर पेरूची नवीन लागवड करण्यात आली आहे. यामुळे उत्पादन वाढणार आहे. शेतकऱ्यांनी बहराचे नियोजन केले असून, त्यातून भरघोस उत्पन्नाची अपेक्षा परिसरातून व्यक्त केली जात आहे.
मोसंबी बागा काढून टाकण्याचा धाडसी निर्णय
• खर्च अधिक आणि त्यामानाने मिळणारा नफा अत्यंत कमी, अशी विदारक स्थिती निर्माण झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी या बागा काढून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला.
• जालना जिल्हा हा मोसंबी उत्पादनासाठी देशात प्रसिद्ध आहे. येथील मोसंबीची विदेशात निर्यात करण्यात येते. परंतु, सध्या दरामध्ये कपात झाल्यामुळे शेतकरी संकटात आहेत.
माझ्याकडे दोन हजार झाडांची मोसंबी बाग आहे; परंतु त्यातून अपेक्षित नफा मिळत नव्हता. त्यामुळे मी आता २५ एकर क्षेत्रावर नवीन पेरूच्या वाणांची लागवड करत आहे. पेरू शेती ही सध्याच्या काळात अधिक परवडणारी आणि शाश्वत आहे. यामुळे पेरूची लागवड केली. - दिनेश वाघ, शेतकरी, हस्तपोखरी.
थेट बांधावर विक्रीची सोय
पेरू पिकाचे दूसरे आकर्षण म्हणजे त्याची बाजारपेठ, पेरूचा बहर येताच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांतील व्यापारी थेट हस्तपोखरी गाठत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावरच सौदे होत असल्याने वाहतुकीचा खर्च वाचतो.
पेरू लागवडीचे फायदे
• पेरूच्या आधुनिक वाणांमुळे लागवडीनंतर अवघ्या १२ महिन्यांत खात्रीशीर उत्पन्न सुरू होते, हा सर्वांत मोठा फायदा शेतकऱ्यांना वाटत आहे.
• मोसंबीच्या तुलनेत पेरूच्या झाडांना पाणी कमी लागते. विशेष म्हणजे, उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासली तरी छाटणी केलेली पेरूची झाडे सहज तग धरू शकतात.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
