भात हे जगभरातील लोकांचे महत्त्वाचे अन्न आहे. आपल्या देशातही भाताला खूप महत्व आहे. भारताचा बासमती तांदूळ जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात भाताचे पीक घेतले जाते.
विशेषतः कोकण, पश्चिम घाट आणि पूर्व विदर्भात. या भागांमध्ये हवामान आणि जमिनीची परिस्थिती भातासाठी योग्य असल्यामुळे, वेगवेगळे खास वाण तयार झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी भाग हा आंबेमोहोर भाताचा उगमस्थान मानला जातो. पूर्वी सखल भागात मोठ्या प्रमाणात आंबेमोहोर लावला जात होता. कारण हे वाण १५० दिवस घेतो, उंचीला वाढतो आणि वाऱ्याचा झोत नसलेल्या ठिकाणीच चांगला येतो.
हा भात जेव्हा फुलतो, तेव्हा त्याला आंब्याच्या मोहोरासारखा सुगंध येतो, म्हणूनच शेतकरी याला 'आंबेमोहोर' म्हणू लागले. हा वाण चवीला आणि वासाला उत्तम आहे. पण, काही अडचणी होत्या.
उंचीमुळे पीक लोळतं उत्पादन थोडे येते. कीड आणि रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो म्हणून शेतकऱ्यांना फायदा कमी मिळत होता, जरी भात प्रसिद्ध होता. नवा वाण हवा होता. जो चवीला चांगला, पण कमी उंचीचा आणि जास्त उत्पादन देणारा असेल.
म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वडगाव मावळ येथील डॉ. शंकररात कळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबेमोहोर आणि 'आयआर आठ' या दोन वाणांचा संकर करून एक नवा वाण तयार केला. १९८८ मध्ये इंद्रायणी हा वाण शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आला.
चव आणि वास दोन्ही आंबेमोहोरसारखेच, उंची कमी त्यामुळे पीक लोळत नाही. कीडरोग कमी, उत्पादन जास्त, रोगप्रतिकारक क्षमता चांगली दरवर्षी नवीन बियाणे घ्यायची गरज नाही.
इंद्रायणी तांदूळ थोडा चिकट असतो. कारण त्यात अमायलेज नावाचे जैवरसायन १७ टक्के असते. हे प्रमाण जरा कमी असल्यामुळे हा भात शिजल्यावर थोडा चिकट होतो.
बिर्याणी वगैरेमध्ये याचा वापर कमी होतो, पण, लहान मुले आणि वयस्कर मंडळी खिचडीप्रेमी यांच्यासाठी इंद्रायणी तांदूळ वरदान ठरत आहे. दुधभात, वरणभात अशा घरगुती जेवणासाठी ही जात अतिशय चवदार आहे.
सध्या आंबेमोहोरचे उत्पादन कमी होत आहे. कारण त्याला लागणारे सेंद्रिय खत कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता इंद्रायणीकडे वळत आहेत.
आज पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात इंद्रायणी हा भातवाप्ण मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे. मावळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील उपाहारगृहांमध्ये ग्राहक आवर्जुन इंद्रायणी भाताची मागणी करतात.
भात खाऊन हॉटेलचालकाला मस्त, छान अशी मनापासून टिप्प्णीही देतात. तसेच राज्यातील अनेक ग्राहक थेट शेतकऱ्यांकडून इंद्रायणी भाताची खरेदी करतात. त्यामुळे मावळ परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.
इंद्रायणीच्या चवीमुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी याच वाणाची निवड करत आहेत. आधुनिक पद्धतीचा अवलंब करून चांगल्याप्रकारे उत्पादन घेत आहेत.
इंद्रायणी वाणांमुळे आर्थिक स्तर उंचावला; युवकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी
◼️ इंद्रायणी वाणांमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावला आहे. तसेच युवकांना रोजगाराच्या संधी मिळाला आहेत. अनेक युवक तांदूळ विक्रीचा व्यवसाय करत आहे.
◼️ याच सोबत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला ट्रॅक्टरसारखे यंत्र मळणी यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्याने मावळ तालुक्यातील शेती बहरू लागली.
◼️ मावळ तालुक्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. भातातून जादा उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेती म्हणजे केवळ धान्याचं उत्पादन नाही, तर तो जीवनाचा श्वास आहे.
◼️ मावळातील शेतकऱ्यांनी काळाशी जुळवून घेतलं, संकटांशी दोन हात केले आणि आधुनिकतेचा स्वीकार करत शेती व्यवसायाला नवजीवन दिले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे मावळमधील शेती बहरत आहे.
नवीनचंद्र बोऱ्हाडे
उपविभागीय कृषी अधिकारी, वडगाव मावळ
अधिक वाचा: शेतजमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद होणार कमी; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा नवा निर्णय