होळी-धूलिवंदन-रंगपंचमीला रासायनिक रंगाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक साधन-संपत्तीचा वापर करून घरच्या घरी इको-फ्रेंडली रंग तयार केले तर शरीराला हानी पोहोचणार नाही, तसेच होळीचा सणही आनंदी होईल.
अनेक शाळांमध्ये नैसर्गिक रंग कसे तयार करावेत, याबाबत प्रात्यक्षिक सादर केले जातात, मात्र बाजारात गेले की मुले रासायनिक रंग खरेदी करतात.
होळीचा बेरंग टाळायचा असेल तर नैसर्गिक रंगांचाच वापर करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनीही केले आहे.
फुलांपासून तयार केलेला नैसर्गिक गुलाल तसेच हळद, बेसन, चंदन, यांसारखे घरगुती पर्याय निवडणे गरजेचे आहे. पाण्याची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात केली जाते. सर्वात आधी पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.
लहान मुलांना रसायनमुक्त रंगच वापरायला दिले जावेत, अॅलर्जी असणाऱ्याला जबरदस्तीने रंग लावणे टाळले पाहिजे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
नैसर्गिक रंगांची निवड करा
◼️ हळद, बीट किंवा फुलांच्या अर्कापासून बनवलेले हर्बल किंवा सेंद्रिय (ऑरगॅनिक) रंग वापरा.
◼️ शिसे किंवा पाऱ्यासारखे विषारी धातू असणारे रासायनिक रंग टाळा.
कशापासून बनतो नैसर्गिक रंग
हिरवा रंग : पालक आणि गुलमोहोराची पाने.
पिवळा रंग : हळद आणि झेंडूची फुले.
लाल रंग : जास्वंद आणि गुलाबाचे फुले.
जांभळा : बीटचे फळ.
केशरी : पळसाचे फूल.
कशी असते प्रक्रिया
◼️ कोणता रंग तयार करायचा याप्रमाणे संबंधित फुले, पानांची पेस्ट तयार करावी.
◼️ ती पेस्ट रात्रभर पाण्यात मिसळून रात्रभर ठेवावी.
◼️ दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून उकळावे.
◼️ उकळल्यानंतर रंग तयार होतो.
◼️ रंगाप्रमाणे थोडीफार कृती वेगवेगळी आहे.
◼️ झेंडूची फुले सावलीत वाळवावी लागतात, नंतर त्याची पूड करावी लागते.
◼️ हळकुंड रात्रभर पाण्यात भिजवावे लागतात.
◼️ शक्यतो कोणताही रंग बनवायचा असेल तर भिजवणे, उकळणे या दोन प्रक्रिया सारख्याच आहेत.
पर्यावरणपूरक रंग कसे ओळखावे?
◼️ पॅकेटवर 'हर्बल' किंवा 'नॅचरल' असा स्पष्ट उल्लेख असावा, घटकांची माहिती दिलेली असावी. कृत्रिम तीव्र सुगंध नसावा.
◼️ रंग हातावर चाचणी केल्यास जळजळ होऊ नये. विश्वासार्ह उत्पादकांचा मालच खरेदी करावा.
नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी निसर्गातील वस्तूंचा वापर केला पाहिजे. त्याचे चे शरीरावर शरीरावर परिणाम होत नाहीत. यासाठी शाळांमधूनही मोठी जागृती होणे गरजेचे आहे.
नैसर्गिक रंग वापरल्यामुळे पाण्याचीही बचत होते. फुलांच्या पाकळ्यांचा वापर नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी व्हावा. इको फ्रेंडली होळी साजरी करणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.
अधिक वाचा: यंदा कसा राहणार उन्हाळा? राज्यात कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक असणार?
