सांगली : राज्यातील साखर कारखान्यांच्या तुलनेत यंदाही गुजरातच्या सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती होणारे ऊसदर जाहीर केले आहेत. हे ऊसदर तोडणी, वाहतूक खर्च वजा करून आहेत.
गणदेवी येथील श्री सहकारी कारखान्याने प्रतिटन तीन हजार ८५१ रुपये भाव दिला. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची गुजरातपेक्षा १२ ते १५ किलोने जास्त साखर उत्पादन मिळते.
मग दर कमी का दिला जातो? असा सवाल शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी केला आहे.
संजय कोले म्हणाले, साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून, ताळेबंद निश्चितीचे काम सुरू आहे. तत्पूर्वी मागील साखर गाळप, उतारा आणि अंतिम दर याबाबतचा अहवाल साखर आयुक्तांना द्यावा लागतो.
राज्यातील कारखान्यांचा ताळेबंद तयार होताना गुजरातमधील कारखान्यांनी दराबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. गुजरातने गेल्या १९ वर्षांची परंपरा सांभाळत यंदा हंगामाचा सर्वोच्च दर दिला आहे. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखाने आजपर्यंत असे करू शकले नाहीत.
गुजरातच्या बार्डोली येथील खेडूत समाज साखर कारखान्याने नोव्हेंबर, डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२५ मधील उसाला प्रतिटन तीन हजार ५०२ रुपये, फेब्रुवारी तीन हजार ६०२, मार्च तीन हजार ७०२, तर एप्रिलमध्ये गाळप उसाला तीन हजार ८०२ रुपये दर जाहीर केला आहे.
सायन कारखान्याने प्रतिटन तीन हजार ५९१ ते तीन हजार ६४१ रुपये, कामरेज कारखान्याने प्रतिटन तीन हजार ४८१ ते तीन हजार ७८१ रुपये, तसेच नर्मदा कारखान्याने प्रतिटन तीन हजार ४५५ ते तीन हजार ५०५ रुपये. गणदेवी येथील श्री सह कारखान्याने १६ ते ३० एप्रिलमध्ये गाळपास आलेल्या उसाला तीन हजार ८५१ रुपये दर जाहीर केला.
सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा साखर उतारा गुजरातपेक्षा १२ ते १५ किलोने जास्त आहे. त्याचे वाढीव ४०० रुपये शेतकऱ्यांना देणे दूर, गुजरात इतकाही दर दिला जात नाही. त्यामुळे ऊसदरात प्रतिटन एकूण आठशे ते हजार रुपये फरक पडतो. साखर सम्राट उद्योजक नसून, शेतकऱ्यांना लुटणारे असल्याची टीका संजय कोले यांनी केली.
अधिक वाचा: या साखर कारखान्याकडून १४२ रुपयाप्रमाणे उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा