सांगली: बाजारात रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली दुसऱ्याच ठिकाणचा आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे.
अशा स्थितीत आता पोस्टामार्फत माफक किमतीत रत्नागिरीचा हापूस आंबा आता सांगली येथील निवडक टपाल कार्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक बसवराज वालिकार यांनी दिली.
वालिकार म्हणाले, भारतीय टपाल विभाग ग्राहकांचे हित जोपासण्याची महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचबरोबर शेतकरी, लहान पुरवठादार, सामान्य उत्पादक, लहान उद्योजक आदींना मदत मदत आहे.
त्यांची उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवून त्यांच्या मालास योग्य भाव व बाजारपेठ मिळवून देण्यास प्रयत्नशील राहिलेला आहे. याच भूमिकेतून रत्नागिरीचा हापूस आंबा सांगली निवडक टपाल कार्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा
◼️ 'शेतकरी ते थेट ग्राहक' या संकल्पनेचा वापर पोस्टामार्फत केला जात असून कोकणातील नामवंत फळ उत्पादकाकडून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला चांगला आंबा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
◼️ हा आंबा कोणत्याही रासायनिक पद्धतीचा वापरशिवाय पिकवलेला असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना खात्रीशीर उत्पादन मिळण्यास मदत होणार असून त्यांना खऱ्या अर्थाने कोकणी मेवा उपभोगता येणार आहे. त्यामुळे कोकणचा अस्सल हापूस आंबा खायची नामी संधी आहे.
१२५० रुपयांना दोन डझन
ग्राहकांना अस्सल हापूस माफक दरात देण्यात येणार आहे. दोन डझनच्या पेटीचा दर १ हजार २५० रुपये असेल. पेटी घरपोच हवी असल्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.
पोस्ट कार्यालयात सुविधा
सांगली मुख्य पोस्ट, मिरज मुख्य पोस्ट, सांगली सिटी पोस्ट, विलिंग्डन कॉलेज पोस्ट ऑफिस, डिस्ट्रिक्ट कोर्ट सांगली पोस्ट ऑफिस, इस्लामपूर पोस्ट ऑफिस, शिराळा पोस्ट ऑफिस येथे नोंदणी करा.
२१ एप्रिलला मिळणार पेटी
सांगली जिल्ह्यातील ग्राहकांना ठराविक टपाल कार्यालयाच्या ठिकाणी १९ एप्रिलपर्यंत आगावू नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतरच त्यांना त्याच कार्यालयात २१ एप्रिल रोज आंबा पेटी प्राप्त होणार आहे.
नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच प्राधान्याने माल देण्यात येणार असल्याने, ग्राहकांनी आगावू नोंदणी करावी. उन्हाळ्यात अस्सल कोकणी मेवा खाण्याचा आनंद घ्यावा. - बसवराज वालिकार, प्रवर डाक अधीक्षक
अधिक वाचा: आंब्यापासून तयार करा ही दोन सोपी उत्पादने आणि सुरु करा स्वताचा प्रक्रिया उद्योग