आप्पासाहेब पाटील
सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत खरीप हंगामातील अतिवृष्टी व पूरस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींसाठी निधी आला आहे.
सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा परिषद, सोलापूर विभागाकडील ६२६ पात्र शेतकऱ्यांना प्रति विहीर १५ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
त्यासाठीचा ९३ लाख ९० हजारांचा निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने 'लोकमत'शी बोलताना दिली.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. या संकटात शेतीपिकांसाठी शेतातील विंधन विहिरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
काही विहिरी खचल्या, तर काही विहिरी बुजल्या होत्या. याबाबत जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (ग्रा.पं. नरेगा) यांनी पाहणी, पडताळणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रमाणपत्र सादर केले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं. नरेगा) यांनी केलेल्या अहवालानुसार ६२६ पात्र शेतकऱ्यांना ९३ लाख ९० हजारांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.
तो निधी लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी सांगितले.
चालू आर्थिक वर्षातच काम पूर्ण करावे लागणार
◼️ सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांकरिता अर्थसाहाय्यास मान्यता दिल्यानंतर दुरुस्तीचे काम चालू आर्थिक वर्षातच पूर्ण करावे लागणार आहे.
◼️ शिल्लक निधी राहिल्यास तो शासनाकडे वर्ग करण्यात येणार आहे. दुरुस्ती केलेल्या सिंचन विहिरींचे जीओ टॅगिंग करण्यात येणार असून, त्याचे फोटोही काढले जाणार आहेत.
◼️ विहीर दुरुस्तीसाठी निधी वापरण्यात यावा, अन्य उपाययोजनांसाठी निधी वापरल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
हमीपत्र लिहून घेणार
◼️ विहीर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे.
◼️ विहीर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी सहायक व तांत्रिक अधिकारी यांच्यामार्फत संयुक्तपणे मोजमाप घेऊन काम पूर्ण झाल्याची खात्री करून झाल्यानंतरच १५ हजारांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
महापूर व अतिवृष्टीने खचलेल्या व बुजलेल्या विंधन विहिरींच्या दुरुस्तीसाठी निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून निधी दिला जाणार आहे. ६२६ पात्र शेतकऱ्यांसाठी २३ लाख २० हजारांचा निधी मंजूर झाला आहे. - कुलदीप जंगम, सीईओ, जिल्हा परिषद, सोलापूर
अधिक वाचा: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार का? वाचा सविस्तर
