पुणे : शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. कीड व रोगविरहित रोपे मिळत नसल्याने उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे.
हे लक्षात घेऊनच देशभरात नऊ स्वच्छ रोप निर्मिती केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यातील तीन केंद्रांची निर्मिती महाराष्ट्रात करण्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.
पुण्यात द्राक्ष, नागपुरात संत्रा आणि सोलापुरात डाळिंब पिकांच्या रोपांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून ३०० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. असेही ते म्हणाले. पुण्यात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या हॅकेथॉन स्पर्धेतील स्टार्टअप अर्थात नवउद्यम संशोधनापुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
ते संशोधन व्यावसायिकदृष्ट्या आणण्यासाठी बाजारामध्ये पुण्यातील कृषी महाविद्यालयात संशोधन केंद्र अर्थात इनक्युबेशन सेंटर उभारावे, अशी सूचना कृषिमंत्री व कृषी आयुक्तांना केली आहे.
अधिक वाचा: काढणी झालेल्या पिकांचीही नुकसान भरपाई मिळणार? प्रस्ताव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश