राहू : साखर कारखान्यांच्या ऊस दराच्या तुलनेत खासगी गुऱ्हाळघरांवर गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ४ हजार २०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
इतिहासात पहिल्यांदाच एवढा उच्चांकी दर मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, ऊस उत्पादक शेतकरी गूळनिर्मितीकडे वळताना दिसत आहेत.
दौड तालुक्यातील उसाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम पट्टयातील राहूबेट परिसरात यंदाच्या हंगामात गुऱ्हाळघरांवर गूळनिर्मितीसाठी उसाची मागणी वाढली आहे.
सध्या गुळाचा बाजारभाव प्रतिक्विंटल ३ हजार ते ३७०० रुपयांदरम्यान असून, उन्हाची तीव्रता वाढल्याने गुळाचा उताराही चांगला मिळत आहे. गुढीपाडव्यापर्यंत उसाचा दर प्रतिटन ४५०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे साखर कारखान्यांकडे गाळपासाठी दिलेल्या उसाला सध्या २८०० ते ३१०० रुपये प्रतिटन दर मिळत आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने अद्याप चालू हंगामासाठी अंतिम दर जाहीर केलेला नसल्याने शेतकरी समाधानकारक दर मिळणाऱ्या गुन्हाळघरांना प्राधान्य देत आहेत.
परिसरातील गुऱ्हाळघरांवर मोठ्या प्रमाणावर ऊसतोड सुरू असल्याने आगामी साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कारखान्यांच्या तुलनेत गुऱ्हाळघरांवर दर चांगला मिळतो, पैसेही लवकर मिळतात आणि कमी कालावधीत गाळप पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांना कांदा, गहू आदी पिकांची लागवड वेळेत करता येते, असेही शेतकरी सांगतात.
३ हजार प्रतिक्विंटल गुळाचा भाव सुरू होत असून तो ३७०० रुपयांपर्यंत जातो. उन्हाची तीव्रता वाढल्याने गुळाचा उताराही चांगला मिळत आहे.
कष्टाने पिकवलेल्या उसाचे योग्य मूल्यमापन गुऱ्हाळघरांवर सध्या जास्तीचा दर मिळत असल्याने कष्टाने पिकवलेल्या उसाचे योग्य मूल्यमापन होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
मशागतीचा खर्च, उसाचे बेणे, खतांच्या वाढलेल्या किमती आणि मजुरीचे वाढलेले दर पाहता सध्या मिळणारा भाव समाधानकारक आहे. मात्र, तो फार जास्तही नाही. - कैलास गरुड, शेतकरी
बाजारातील गुळाचा भाव पाहता गुऱ्हाळ चालवणे ही मोठी कसरत आहे. मजूर वर्ग सांभाळण्यासाठी सध्या 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर व्यवसाय करावा लागत आहे. - संजय नवले, गुऱ्हाळ चालक, राहू
अधिक वाचा: पीएम किसानचा हप्ता न मिळाल्यास काय कराल? कशी तपासाल लाभार्थी यादी? जाणून घ्या सविस्तर
