सोलापूर : बऱ्याच शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे जमा न करता १०० टक्के एफआरपीनुसार पैसे जमा केल्याची खोटी माहिती दिलेल्या संत कुर्मदास साखर कारखान्यावर कारवाई करण्याचे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी साखर सहसंचालकांना दिले आहे.
लागलीच साखर सहसंचालकांनी याबाबत कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना खुलासा विचारला आहे. माढा तालुक्यातील संत कुर्मदास साखर कारखान्याला तुंगत, फुलचिंचोली, तारापूर या भागातील शेतकऱ्यांनी मागील हंगामात ऊस पुरवठा केला होता.
काही शेतकऱ्यांना अर्धवट रक्कम मिळाली आहे तर काहींना एक रुपयाही मिळाला नाही. शेतकरी दिवस-दिवस कारखाना स्थळावर थांबत आहेत. मात्र, पैसे काही मिळत नाहीत.
चिटबॉय, वर्कर, ऊस पुरवठा अधिकारी, कार्यकारी संचालक व चेअरमन यांना पैशासाठी वारंवार भेटत आहेत. मात्र, पैसे मिळत नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना एक महिन्याची पुढची तारीख टाकून चेक दिले आहेत. मात्र, चेक बाऊन्स होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांना याबाबत पत्र दिले आहे.
शेतकऱ्यांचे पैसे देणे असताना संपूर्ण एफआरपी दिल्याची खोटी माहिती संत कुर्मदास कारखाना व्यवस्थापनाने दिली असल्याचे पत्रात म्हटले आहे.
खोटी माहिती देऊन शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याने कारखाना व्यवस्थापनावर कारवाई करण्याचे पत्रात म्हटले आहे. साखर सहसंचालक सुनील शिरापूरकर यांनी संत कुर्मदास कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देऊन याचा खुलासा विचारला आहे.
माझा ४८ टन ऊस संत कुर्मदास साखर कारखान्याला गेला आहे. अधिकाऱ्यांना सतत फोन केल्यावर वेळ मारून नेली जाते. एक महिन्याची पुढची तारीख टाकून २ जून रोजी चेक दिला होता. तो बाऊन्स झाला.
आता कारखान्याचे अधिकारी चेक आमच्याकडे जमा करा, पैसे आरटीजीएस करतो असे म्हणतात. आमच्या गावातील व भागातील अनेक शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले नाहीत असे शेतकरी सांगता आहेत.
अधिक वाचा: Jamin Mojani : शेतजमीन मोजणी जलद होण्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय: वाचा सविस्तर