थंडीच्या दिवसांत हरभऱ्याच्या पाल्याची भाजी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. सद्यःस्थितीत बाजारात हिवाळ्यातील हरभऱ्याची भाजी विक्रीस येऊ लागली आहे.
विशेषतः थंडीतच ही भाजी उपलब्ध होते. हरभरा भाजीत कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न, झिंक, मॅगनीज, कॉपर अधिक प्रमाणात असल्याने तिच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हरभऱ्याच्या पानांची भाजी चवीला अतिशय चांगली असते. या भाजीत डायटरी फायबर अधिक असल्याने मानवी शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. मधुमेह टाळण्यास मदत होते. या भाजीत मोठ्या प्रमाणात मिनरल्समुळे आरोग्याच्या विविध तक्रारींवर मात करता येते. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड होते.
सद्य:स्थितीत या पिकाची राज्यभर लागवड झाली असून, हरभऱ्याचे पीक जोमाने वाढत आहे. कडाक्याची थंडी हरभऱ्यासाठी पोषक मानली जाते. जेवढी थंडी अधिक तेवढे पीक चांगले वाढते. हरभऱ्याची हिरवी भाजी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
हरभरा भाजीच्या सेवनाचे फायदे
• हरभऱ्याच्च्या हिरव्या भाजीचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते, जे हृदयाच्या आजाराचा बचाव करते. यामध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
• तसेच कॉपर आणि झिंकमुळे त्वचेची चमक वाढते. भाजीतील आयर्न हे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करते. तसेच मधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी भाजी खूप फायदेशीर ठरते.
आहारतज्ज्ञ काय म्हणतात ?
• हरभऱ्याच्या हिरव्या भाजीत खूप अधिक प्रमाणात मिनरल्स आणि पॉवरफुल अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारींवर मात करता येते.
• भाजीत डाएटरी फायबर जास्त असल्यामुळे शरीरातील शुगर लेवल पटकन वाढ होत नाही. या कारणामुळे मधुमेहात याचा जास्तीत जास्त उपयोग होतो.
• ही भाजी मुगाच्या डाळीसोबत तयार केल्यास कुणाला भाजीमुळे पित्त होत असेल तर पित्त होणार नाही, असे आहारतज्ज्ञांनी सांगितले.
