रत्नागिरी : फळपीक विमा योजनेंतर्गत हवामानातील बदलाची नोंद घेण्यासाठी जिल्ह्यातील ६५ महसूल मंडळांत तापमापक यंत्र बसविण्यात आले आहेत.
ही तापमापक यंत्रे काही ठिकाणी माळरानावर, तर काही ठिकाणी बागायतीमध्ये बसविली आहेत. झाडी असलेल्या भागातील तापमापक यंत्रे हवामानातील बदल टिपण्यास कुचकामी ठरत आहेत.
त्याचा फटका बागायतदारांना बसत आहे. सन २०२४ च्या हंगामात जयगड भागातील बागायदारांचे ट्रीगर अॅक्टिव्हेट न झाल्याने भरपाई मिळाली नाही.
हवामानातील बदलाचा परिणाम आंबा, काजू पिकांवर सर्वाधिक होतो. खत व्यवस्थापनापासून आंबा, काजू बाजारात येईपर्यंत परिश्रम व पैसाही खर्च होतो.
तुलनेने दर न मिळणे किंवा अपेक्षित उत्पादन न मिळाल्यास बागायतदारांचे आर्थिक नुकसान होते. बागायतदारांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी फळपीक विमा योजना जाहीर केली. मात्र, तापमापक यंत्र चुकीच्या ठिकाणी बसविल्याची तक्रार आहे.
शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सारखे तापमान असेलच असे नाही. परंतु, बदलाची नोंद होणे आवश्यक असताना, ती होत नाही. परिणामी भरपाईपासून वंचित रहावे लागते.
ग्रामपंचायती उदासीन
जुनी तापमापक यंत्रे हवामानातील बदल टिपण्यास कमी पडत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायत परिसरात स्वयंचलित तापमापक यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रत्येक गावातील तापमानाची नोंद होऊन नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देणे सुलभ होईल. परंतु, ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध होण्यासच विलंब होत असल्याने योजना बारगळली आहे.
बागायतदारांची बोळवण
दरवर्षी विमा हप्त्यासाठी लाखो रूपये भरले जातात. तुलनेने बागायतदारांना तुटपुंजी रक्कम देऊन बोळवण केली जाते तर काही उपेक्षित राहतात. त्यापेक्षा झालेल्या नुकसानाचा योग्य परतावा देणे अपेक्षित आहे.
अधिक वाचा: माळेगाव साखर कारखान्याने मागील १० वर्षात उसाला कसा दिला दर? सर्वाधिक दर कोणत्या वर्षी?