सणसर : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२०२६ च्या गळीत हंगामाची गुरुवारी (दि. १२) यशस्वी सांगता झाली.
अवघ्या १०४ दिवसांत ७ लाख ५६ हजार २८५ मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले असून त्यातून ८ लाख ५६ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा साखर उताऱ्यात वाढ झाल्याने कारखाना पुणे जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आतापर्यंत ३ कोटी ९२ लाख ५१ हजार ३०० युनिट्स वीज निर्मिती झाली. अंतर्गत वापर वजा जाता २ कोटी ५७ लाख ६६ हजार युनिट्स वीज महावितरण कंपनीला निर्यात करण्यात आली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक उपाध्यक्ष कैलास गावडे व संचालक मंडळाने प्रतिकूल परिस्थितीत केलेले नियोजन सभासदांच्या कौतुकाचा विषय ठरले.
हंगामाच्या सुरुवातीपासून दररोज आठ हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऊस गाळप करण्यात यश आले. यंदा १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
मात्र परिसरातील सर्वच साखर कारखान्यांना उसाची टंचाई भासत असल्याने काही सभासदांनी ऊस इतर कारखान्यांकडे वळवला. तसेच अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादनात घट झाली. परिणामी अपेक्षित गाळप पूर्ण होऊ शकले नाही.
तरच कारखाना आर्थिक संकटातून बाहेर पडेल
सध्या कारखाना आर्थिक अडचणींचा सामना करीत असून ऊस गाळप व साखर उताऱ्यात सातत्याने वाढ झाल्यासच कारखाना या संकटातून बाहेर पडू शकेल, अशी भावना संचालक मंडळाने व्यक्त केली.
अधिक वाचा: उपग्रहाने केला भंडाफोड; जळगाव जिल्ह्यात केळी पिकासाठी २१६ कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड
