आज २२ मार्च रोजी जगभरात जागतिक पाणी दिवस साजरा केला जात असून, पाण्याचे संवर्धन आणि कार्यक्षम वापर याबाबत जनजागृती करण्याचा हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. पृथ्वीच्या अंतरंगात ९७% पाणी हे महासागरात खारे पाण्याच्या स्वरुपात आहे. जे की पिण्याच्या किंवा शेती वापराच्या योग्य नाही.
उर्वरित शिल्लक असलेल्या ३% पाण्यापैकी २% पाणी उत्तर अणि दक्षिण गोलार्धात बर्फाच्या स्वरुपात असल्याने तेही पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरणे शक्य नाही. तथापि शेवटी शिल्लक असलेल्या १% पाणी पैकी ०.६% पाणी शहरातील, तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी अणि विविध करखान्यांसाठी संरक्षित केलेले आहेत.
आता फक्त पृथ्वीतलावरील शिल्लक असलेले केवळ ०.४% पाणी शेतीसाठी वापरावे लागत आहेत. पुढे ही यात कपात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रावर पाण्याचा ताण दिवसेंदिवस वाढत असून, शाश्वत शेतीसाठी येणाऱ्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक बनले आहे.
भारतासारख्या कृषीप्रधान देशात पाण्याचा योग्य वापर हा उत्पादनवाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतीसाठी विशेष करून, पारंपरिक पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात (६०%) पाण्याचा अपव्यय होत असतांना, ठिबक व सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानामुळे पाण्याचा वापर ४०-६० टक्क्यांनी कमी करता येतो आणि उत्पादनात ५०-६० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
यासाठी सध्या राज्यात कार्यरत असलेल्या विविध इरिगेशन कंपनी देत असलेल्या सूक्ष्मसिंचन प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन, स्प्रिंकलर आणि क्रॉप कुलिंग तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे शक्य झाले आहे. ज्यामुळे “More Crop Per Drop” ही संकल्पना आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
भारतासह महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास पाण्याचे संवर्धन तर होईलच शिवाय पीक उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढतील. तसेच संत्रा, मोसंबी, आंबा, केळी आणि ऊस पिकांमध्ये crop cooling तंत्राचा वापर केल्यास उष्णतेचा ताण कमी करून उत्पादन टिकवून ठेवता येते.
या जागतिक पाणी दिनानिमित्त प्रत्येक शेतकऱ्याने पाण्याचा अपव्यय टाळून, आधुनिक सिंचन तंत्रज्ञान स्वीकारण्याचा संकल्प करणे ही काळाची गरज आहे. पाणी हेच जीवन असून, त्याचे संवर्धन म्हणजेच आपल्या भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. “पाणी वाचवा, शेती वाचवा आणि भविष्य घडवा” हीच या दिवसाची खरी प्रेरणा ठरावी.
गुणवंत एस. डफरे
वरीष्ठ कृषी तंज्ञ
