ओतूर : जुन्नर तालुक्यात कांदा हे प्रमुख नगदी पीक असून, तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा बीजोत्पादन करतात.
मात्र यंदा मधमाशांची संख्या लक्षणीय घटल्याने कांदा बीजोत्पादनावर गंभीर परिणाम होत असल्याचे माळशेज परिसरातील शेतकरी सांगत आहेत.
कांदा पिकामध्ये परागीभवनासाठी मधमाशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मधमाशांच्या मदतीने योग्य परागीभवन झाले तर बीजधारणा चांगली होते आणि उत्पादन दर्जेदार मिळते.
गेल्या काही वर्षापासून कीटकनाशकांचा अतिवापर, हवामानातील अचानक बदल, अवकाळी पाऊस तसेच नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने मधमाशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
याचा थेट परिणाम कांदा फुलोऱ्यावर होत असून, फुले उमलूनही अपेक्षित प्रमाणात बीजधारणा होत नाही. परिणामी उत्पादन खर्च वाढूनही शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित बीजोत्पादन येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
माळशेज घाट परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कांदा बीजोत्पादनासाठी मोठी गुंतवणूक केली होती.
मात्र मधमाशांची संख्या कमी असल्याने उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांनी मधमाशांचे संवर्धन करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर मर्यादित करणे, नैसर्गिक शेतीकडे वळणे तसेच मधमाशी पालनाला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शासनानेही याबाबत मार्गदर्शन व मदत दिल्यास कांदा बीजोत्पादनातील ही समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
यंदा मधमाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने कांदा बीजोत्पादनावर गंभीर परिणाम होत आहे. मधमाशा याव्यात म्हणून आम्ही विविध ठिकाणी सूर्यफुलाची लागवड केली, मात्र तरीही शेतात मधमाशा कमीच दिसत आहेत. परागीभवन नीट न झाल्यामुळे बीजधारणा घटत असून, उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. - भास्कर डुंबरे, कांदा बी उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: भारत-अमेरिका कराराचा सोयाबीन बाजारावर तत्काळ परिणाम? दर वाढले की कमी झाले?
