ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सक्षम करण्याबरोबरच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या (पीएमएफएमई) माध्यमातून गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यात सुमारे ४१ कोटी रुपयांची गुंतवणूक होत १२२३ सूक्ष्म खाद्य उद्योगांना चालना मिळाली आहे.
विशेष म्हणजे केळी प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ तसेच पल्स बेस्ड प्रॉडक्ट तयार करणाऱ्या उद्योगांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे जळगावच्याकेळीसह मसाल्यांच्या माध्यमातून खाद्यपदार्थाचा सुगंध वाढत आहे
असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण करणे, त्यांना तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील लघुउद्योगांना प्रोत्साहन मिळाल्याने स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन होऊन शेतमालाला अधिक दर मिळण्यास मदत होत आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांना प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्क्यांपर्यंत, कमाल १० लाख रुपयांपर्यंत क्रेडिट-लिंक्ड भांडवली अनुदान (सबसिडी) दिले जाते.
केळीपासून विविध खाद्यपदार्थ
केळीपासून वेफर्स सर्वाधिक उत्पादन घेतले जात आहे. तळून किंवा व्हॅक्यूम फ्राय करून तयार करुन त्यावर प्रक्रिया केली जात आहे. त्यासोबतच केळीचे पीठ, पिकलेली केळी वाळवून त्यापासून सुकेळी, पावडर, चॉकलेट आणि टॉफी, केळीचा ज्यूस आणि प्युरी, लोणचे आणि चटणी या खाद्य पदार्थाची निर्मिती केली जात आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पनिहाय गुंतवणूक
| प्रकल्प | उद्योगांची संख्या | गुंतवणूक (रक्कम) |
| पशुखाद्य | ४१ | २,०१,८४,६६४ |
| बेकरी प्रॉडक्ट | ६२ | ३,०७,०१,२८५ |
| केळीचे पदार्थ | १७८ | ५,०१,२७,०१५ |
| मिरची | १५ | ६३,१७,२१३ |
| दाळ | १९ | ५६,९७,२१३ |
| मका | १५ | ६९,८८,६०१ |
| दुग्ध उत्पादने | १७० | ८,६४,४९,२६१ |
| कडधान्ये | १९ | ४६,३४,६९४ |
| तेलबिया | ३७ | १,०७,७६,५४९ |
| कांदा | ९० | ९०,३३,५०० |
| बटाटा | ०७ | २९,९०,२१० |
| पल्प बेस्ड प्रॉडक्ट | १४२ | ३,९९,७६,१८६ |
| फरसाण | ३३ | १,३२,१९,२५५ |
| मसाला | ११६ | ५,३०,३०,८९० |
| भाजीपाला | ३७ | २९,३१,२३६ |
| गहू | ५८ | १,५६,७९,१९४ |
| एकूण | १२२३ | ४१,३९,०४,६०९ |
'केळी'वर सर्वाधिक प्रक्रिया
• केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग जसे की, केळी चिप्स, पावडर, पल्प यांना मोठी चालना मिळाली आहे.
• याशिवाय दुग्ध प्रक्रिया उद्योगांमधून दही, पनीर, तूप यांसारख्या उत्पादनांचे उत्पादन वाढले आहे. तसेच कडधान्यांपासून बनणाऱ्या विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीतही वाढ झाली आहे.
• मात्र केळीचे १७८ तर दूग्धावर आधारित जिल्ह्यात १७० उद्योगांची पायाभरणी झाली आहे. काहींनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून या उद्योगांना चालना दिली आहे.
