करमाळा : आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्याने व आठ दिवसांहून अधिक कालावधी उलटून ही शांतता प्रस्थापित होत नसल्याने आखाती देशात निर्यातक्षम केळी जात नाही.
त्यामुळे करमाळा तालुक्यातील जवळपास १२०० कंटेनर म्हणजे ७ कोटी रुपयांच्या केळीचे बॉक्स कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून आहेत.
अमेरिका, इस्त्रायल व इराणसह संपूर्ण आखाती देशात युद्धामुळे अशांतता पसरलेली असून, निर्यातक्षम केळी उत्पादकांना याचा मोठा फटका बसला आहे.
आखातमधील व्यापाऱ्यांनी युद्धामुळे केळीची खरेदी बंद केली असून, पूर्वी परिस्थितीच्या युद्धजन्य करमाळ्यातून पाठवलेले कंटेनर आता परत यायला सुरुवात झाली आहे. तर जवळपास १२०० कंटेनर केळी कोल्ड स्टोअरेजमध्ये बॉक्स पॅकिंग करून पडून आहेत.
तीनशे कंटेनर आले परत
नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय पोर्ट (जेएनपीटी) मध्ये अडकलेले तब्बल तीनशे कंटेनर परत यायला लागले असून, तो सर्व माल देशात पाठवला जात आहे.
तोडणी थांबविण्याच्या सूचना
युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या करमाळा तालुक्यातील कोल्ड स्टोअरेज अंदाजे ७ते ८ कोटींचा केळी पॅकिंग केलेला बॉक्समधील माल पडून आहे. आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्याने केळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना तोड थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी पुढील सूचना येईपर्यंत माल पाठवू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत असे असले तरी केळी वेळेत पोहोचली नाही. तर व्यापाऱ्यांसोबत उत्पादकांनाही मोठा फटका बसणार आहे. दरम्यान, देशांतर्गत केळीला मागणी आहे. - सनी इंगळे, केळी व्यापारी, फलटण
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. त्यामुळे आपल्या देशांतर्गत उत्तर भारतमधील मोठ्या शहरातून उपवासासाठी केळीला मोठी मागणी असल्याने तोडणीलायक केळीची तोड करून विक्री केली जात असून, तेथे माल पाठवला जात आहे. खोडवा केळी ९ ते १० रुपये किलो भाव मिळत आहे. - गणेश जाधव, हिवरवाडी, ता. करमाळा
अधिक वाचा: राज्यात १२६ कारखान्यांची धुराडी बंद, ९५ लाख टन साखर उत्पादन; सर्वाधिक साखर उतारा कुठे?
