शहरांसह ग्रामीण भागातही आता पिण्यासाठी घरोघरी, कार्यालयात, हॉटेल-ढाब्यांमध्ये आरओ जारचे पाणी सर्रास वापरले जाते.
मात्र, खासगी आरओ प्रकल्पांचे परवाने, पाण्याचे स्रोत, शुद्धतेची तपासणी आणि नियमांचे पालन याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
पैसे मोजून घेतलेले पाणी खरोखरच सुरक्षित आहे का, हे पाहणेही महत्त्वाचे असल्याचा सूर नागरिकांतून उमटत आहे.
घराघरांत आता जारचे पाणी पिण्याकरिता पूर्वी नळाचे किंवा विहिरीचे पाणी वापरले जात होते. आता मात्र बहुतांश कुटुंबे, विविध कार्यालयातील कर्मचारी २० लीटरच्या जारवर अवलंबून आहेत.
पाणीटंचाई, अनेक ठिकाणी नळाद्वारे मिळणारे दूषित पाणी आणि 'शुद्धते'ची मानसिक खात्री, यामुळे जार संस्कृती वाढली आहे. लग्न समारंभासाठी जारचे पाणी सर्रास वापरले जाते. मात्र, उन्हाळ्यात काळजी घेणे आवश्यक आहे.
आरओच्या पाण्याचा टीडीएस व इतर निकष किती हवेत?
◼️ तज्ज्ञांच्या मते पिण्याच्या पाण्याचा टीडीएस साधारण ५० ते १५० मिलिग्रॅम प्रतिलिटर दरम्यान असावा.
◼️ पीएच ६.५ ते ८.५ दरम्यान असणे आवश्यक आहे.
◼️ जंतू, ई-कोलाई, कोलिफॉर्म जिवाणू आर्दीची उपस्थिती शून्य असायला हवी.
आरओ प्लांटमध्ये शुद्धी करणाची प्रक्रिया काय?
◼️ सामान्यतः कच्चे पाणी प्रथम सँड फिल्टर, कार्बन फिल्टरमधून जाते.
◼️ त्यानंतर 'रिव्हर्स ऑस्मोसिस मेंब्रेन'द्वारे सुक्ष्म अशुद्धी, जंतू आणि क्षार कमी केले जातात.
◼️ काही ठिकाणी युव्ही किंवा ओझोन प्रक्रियाही केली जाते.
◼️ मात्र, सर्व प्लांटमध्ये ही प्रक्रिया प्रमाणित पद्धतीने होतेच असे नाही.
पाण्याची शुद्धता कोण तपासते?
◼️ दुर्घटना घडल्यावर धावपळ एफडीए, स्थानिक स्वराज्य संस्था व अधिकृत प्रयोगशाळांमार्फत पाण्याचे नमुने तपासले जातात.
◼️ मात्र, तपासण्यांची वारंवारता आणि सर्व प्लांटपर्यंत अधिकारी, कर्मचारी पोहोचतात का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
◼️ मनुष्यबळ कमी असल्याचे कारण संबंधित यंत्रणांकडून अनेकवेळा दिले जाते.
◼️ दूषित पाण्यामुळे एखादी दुर्घटना घडली की, मग प्रशासनाकडून धावपळ केली जाते.
आरओ आणि बॉटलिंग प्लांटचे नियम काय?
◼️ पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरसाठी अन्न व औषध प्रशासन आणि बीआयएस मानके लागू असतात.
◼️ पाण्याचे नमुने नियमित तपासणीसाठी पाठवणे, परवाना नूतनीकरण, स्वच्छता व लेबलिंगचे नियम बंधनकारक आहेत.
अनेक आरओ प्लांट पण किती परवाने?
◼️ आपल्या शेजारी लहान-मोठे अनेक आरओ प्लांट आहेत. मात्र, त्यापैकी किती जणांकडे वैध परवाना आहे.
◼️ किती जणांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी केली आहे, याबाबत तपासणी आवश्यक आहे.
◼️ काही सामाजिक कार्यकर्त्याकडून या पाण्याच्या तपासणीची मागणी होत आहे.
अधिक वाचा: कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर
