पुणे : हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहरातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले असून, चार पिकांसाठी ३० जूनची मुदत ठेवण्यात आली आहे.
तर अन्य पिकांसाठी १४ व ३१ जुलै अशी मुदत असेल. योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी तसेच अॅग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.
फळपीक विमा योजना मृगबहर २०२५ साठी शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी विमा पोर्टल https://pmfby.gov.in/farmerLogin सुरू झाले आहे.
केंद्र सरकारने सुरुवातीला लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा या चार पिकांसाठी १४ जून ही सहभागाची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत ३० जून करावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे, असे आवटे यांनी स्पष्ट केले.
याच योजनेत मोसंबी व चिकू पिकासाठी ३० जून तर डाळिंबासाठी १४ जुलै व सीताफळासाठी ३१ जुलै अशी मुदत असेल.
फळपिकांच्या उत्पादनावर कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, जास्त आर्द्रता या सारख्या हवामान घटकांचा विपरीत परिणाम होतो.
या योजनेतून अशा नैसर्गिक परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.
तर पीक विमा अर्ज होऊ शकतो रद्द
- आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन धारणा उतारा, ई पीक पाहणीतील जिओ टॅग फोटो तसेच ई पीक पाहणी बंधनकारक आहे.
- ई पीक पाहणी नोंद नसल्यास पीक विमा अर्ज रद्द होऊ शकतो.
- ही ई पीक नोंदणी पीक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात करू शकतात, असेही आवटे यांनी स्पष्ट केले आहे.
चार फळपिकांसाठी मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे. - विनयकुमार आवटे, कृषी संचालक, प्रक्रिया व नियोजन, पुणे
अधिक वाचा: आता सातबारा व इतर भूमी अभिलेख विभागाचे दाखले मिळणार थेट व्हॉटस ॲपवर