बार्शी : तालुक्यातील उंबर्गे येथील शेतकरी संजय संदीपान देशमुख यांनी कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने संतप्त होऊन तीन एकरांतील उभे कांदा पीक ट्रॅक्टरने नांगरून टाकल्याची धक्कादायक घटना घडली.
वाढते उत्पादन खर्च आणि बाजारातील घसरते दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र या घटनेतून समोर आले आहे.
देशमुख यांनी गट क्र. १९३/२-ब मधील तीन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. रोपांवर सुमारे ३० हजार रुपये, लागवड व मशागतीवर ७० हजार रुपये, तर खत व औषधांवर ३० ते ४० हजार रुपये असा मोठा खर्च झाला.
पहिल्या टप्प्यात ८० कट्टे कांदा काढणीसाठी मजुरी २१ हजार व बारदाना ४,५०० रुपये असा सुमारे २५,५०० रुपयांचा खर्च झाला; मात्र बाजारात नेल्यानंतर केवळ २३ हजार रुपयांचीच पट्टी मिळाली.
म्हणजे काढणीचा खर्चही निघाला नाही आणि उत्पादन खर्च पूर्णपणे बुडाला. वाढते कर्ज व मानसिक तणावामुळे त्यांनी उभे पीक नांगरण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
हमीभाव जाहीर करण्याची मागणी
◼️ संजय देशमुख यांनी शासनाकडे नुकसानीचे अनुदान आणि कांद्याला किमान तीन हजार रुपयांपेक्षा जास्त हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली आहे.
◼️ योग्य दर न मिळाल्यास कांदा उत्पादकांसमोर टोकाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली.
◼️ बाजारातील अस्थिर दर, वाढता खर्च व कर्जाचा बोजा लक्षात घेता शासनाने तातडीने हमीभाव, बाजार हस्तक्षेप व आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
अधिक वाचा: जमिनीला आलाय सोन्याचा भाव; शेतजमिनी विकण्याकडे शेतकऱ्यांचा का वाढतोय कल? वाचा सविस्तर
