कोल्हापूर : तापमानवाढ तसेच पिकांवर होणाऱ्या औषध फवारणीमुळे मधुमक्षिकांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी जिल्ह्यात बी-बियाणे फळबागांच्या आणि बीजोत्पादनावर फारसा परिणाम झालेला नाही.
कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्रीच्या डोंगररांगामधील जिल्हा आहे. यामुळे मधुमक्षिकापालन उद्योग येथे भरभराटीला आला आहे. जिल्ह्यातून ४८ हजार किलो मध उत्पादन होते.
जेव्हा नर फुलातील परागकण मादी फुलाकडे वाहून नेले जातात, त्यास परागीकरण म्हणतात. एकूण शेतपिकांच्या १५ टक्के पिकांमध्ये स्वपरागीभवन घडून येते.
त्यात एकाच झाडावरील परागकणांच्या हेरफेरीसाठी गुरुत्वाकर्षण किंवा हवेसारखे घटक कारणीभूत ठरतात, तर ८५ टक्के शेतपिकांमध्ये परपरागीभवन दिसून येते.
फुलांच्या फलनक्रियेसाठी अन्य झाडावरील परागकण मिळवून परागीभवन क्रिया पूर्ण होते. अशावेळी या फुलांना वाहकाची गरज पडते.
अशा वाहक कीटकांना परागीभवन करणारे कीटक म्हणून ओळखले जाते. त्यात मधमाशीचा समावेश होतो.
मधमाश्यांद्वारे परागीभवन होणारी पिके
१) फळझाडे
लिंबू, संत्रा, मोसंबी, बदाम, सफरचंद, चेरी, अक्रोड, द्राक्ष, आंबा, डाळिंब, नारळ, आवळा, पपई, स्ट्रॉबेरी इ.
२) भाजीपाला
टरबूज, भेंडी, वांगी, टोमॅटो, कारली, पडवळ, भोपळा, काकडी इ.
३) कडधान्ये व तेलवर्गीय पिके
राई, सूर्यफूल, चवळी, मटकी, उडीद, तूर, मूग, वाल, घेवडा इ.
४) बीजोत्पादनासाठी
कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर, कांदा, मेथी, गाजर, लवंग, मुळा इ.
५) तृणधान्य पिके
ज्वारी, बाजरी व मका इ.
जिल्ह्यात तापमान, रोग, औषध फवारणी यामुळे मधमाश्यांच्या १२३० वसाहती निघून गेल्या होत्या. परंतु, आता ४३३८ पेट्या कार्यरत आहेत. इतर जिल्ह्यांपेक्षा हे प्रमाण चांगले आहे. - श्रीकांत जवंजाळ, जिल्हा खादी, ग्रामोद्योग अधिकारी
अधिक वाचा: सिल्क समग्र-२ योजनेचे अनुदान वितरीत करण्यासाठी शासनाची मंजुरी; वाचा सविस्तर निर्णय