जगभरात सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश म्हणून भारताचा प्रथम क्रमांक लागतो. पशुसंवर्धन विभागाचे प्रभावी पैदास धोरण, पशुवैद्यकांचे योगदान व पशुपालकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला वापर यामुळेच आपण हे स्थान टिकवून ठेवले आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आज निसर्गाचा लहरीपणा व जनावरांची कमी दूध उत्पादन क्षमता यांसारख्या आव्हानांचा सामना करत आहे.
यावर उपाय म्हणून केवळ पशुधनाची संख्या न वाढवता, त्यांची अनुवांशिक गुणवत्ता (Genetic Improvement) सुधारणे ही काळाची गरज आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग 'लिंग विनिश्चित वीर्यमात्रा' व 'भ्रूण प्रत्यारोपण' ही तंत्रज्ञाने पशुपालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे.
भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान (Embryo Transfer Technology - ETT/IVF)
हे तंत्रज्ञान म्हणजे पशुपालनातील 'टेस्ट ट्यूब बेबी' होय. याद्वारे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी/म्हशींपासून अनेक उच्च उत्पादनक्षम गुणवत्तेची पैदासक्षम वासरे मिळवता येतात.
कार्यपद्धती
◼️ उच्च वंशावळीच्या 'दाता' (Donor) गायीच्या स्त्रीबीज कोषातून त्रीबीज काढून प्रयोगशाळेत निवडक वळूच्या वीर्याने फलित केले जाते.
◼️ तयार झालेले भ्रूण (Embryo) त्यानंतर कमी दूध उत्पादन क्षमता असलेल्या 'दायी' (Recipient/Surrogate) गायीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जातात.
तंत्रज्ञानाचे फायदे व महत्त्व
१) एका वर्षात अनेक वासरे
नैसर्गिकरित्या गाय वर्षाला एका वासराला जन्म देते, परंतु ETT तंत्रज्ञानामुळे एकाच उच्च वंशावळीच्या गायीपासून वर्षाकाठी ४० ते ५० वासरे मिळवणे शक्य आहे.
२) वंध्यत्वावर मात
वयात आलेल्या कालवडी, वयस्कर गायी किंवा तात्पुरते वंध्यत्व असलेल्या जनावरांकडूनही त्रीबीज संकलित करून त्यांपासून भ्रूण तयार करता येतात.
३) कमी उत्पादनक्षम जनावरांचा उपयोग
गोठ्यातील कमी दूध देणाऱ्या किंवा गावरान जनावरांचा वापर 'सरोगेट मदर' म्हणून करून त्यांच्यापासून उच्च दर्जाची पैदास घेता येते.
४) देशी गोवंशाचे संवर्धन
गाई-म्हशींच्या शुद्ध वंशावळी जोपासण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान आहे.
अधिक वाचा: 'रेबीज' १०० टक्के मृत्यूदर असणारा आजार; वेळीच ओळखून कसे कराल उपचार? जाणून घ्या सविस्तर
